महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'बिहार निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना विरोधी पक्षात बसेल' - Ravi Rana over farmers economic package

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधल्यानंतर विरोधकांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

आमदार रवी राणा
आमदार रवी राणा

By

Published : Oct 27, 2020, 12:25 PM IST

Updated : Oct 27, 2020, 1:08 PM IST

अमरावती- बिहार निवडणुका संपल्या की हे सरकार आपोआप पडणार असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. शिवसेना ही विरोधी पक्षात दिसेल, असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर राज्यातील सरकार पाडून दाखवाच, असे थेट आव्हान विरोधकांना दिले. त्यावर राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधल्यानंतर विरोधकांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात निव्वळ भाजपवर टीका केली आहे. शेतकऱ्यांविषयी ते तिथे एक शब्दही काहीच बोलले नाही.

बिहार निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना विरोधी पक्षात बसेल

विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याबाबत ते काहीच बोलले नाही. जाहीर केलेल्या दहा हजार रुपयांच्या पॅकेजमधून महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे इंचभरही चांगले होणार नाही. शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी दहा हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका आमदार राणा यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, की पंचवीस हजार रुपये हेक्टर व फळबागाला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत देणे गरजेचे होते. त्यात मदतीची मर्यादाही दोन हेक्टरची केली. हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, हे लक्षात येत नाही.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत आमदार रवी राणा यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीदेखील महाविकासआघाडीवर सातत्याने टीका केली आहे.

दसऱ्याच्या मेळाव्यात काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे व त्यांचे कुटुंबीय, भाजप नेते, राज्यपाल व केंद्र सरकावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले होते, की सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या. पण थोडे लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देशावर कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे. संपूर्ण देशात फार विचित्र परिस्थिती सुरू आहे. आर्थिक घडी नीट बसवण्याऐवजी ते इतरांचे सरकार पाडण्यात मग्न आहेत.

Last Updated : Oct 27, 2020, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details