महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2021, 8:42 AM IST

ETV Bharat / city

राज्यातील सर्वात सक्षम वन्यजीव पथक म्हणून अमरावतीचा पथकाचा नावलौकिक; शेकडो वन्यप्राण्यांना दिले जीवनदान

मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यजीवांना वनामध्ये सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी हे पथक बजावीत आहे. महाराष्ट्रातील सर्वात सक्षम असे वन्यजीव सुरक्षा पथक म्हणून अमरावतीच्या पथकाचा नावलौकिक आहे.

amravati latest news
amravati latest news

अमरावती -मनुष्य आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातील सुरक्षा पथक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यजीवांना वनामध्ये सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी हे पथक बजावीत आहे. महाराष्ट्रातील सर्वात सक्षम असे वन्यजीव सुरक्षा पथक म्हणून अमरावतीच्या पथकाचा नावलौकिक आहे.

प्रतिक्रिया

दोन वर्षात अनेक मोहिमा फत्ते -

6 ऑगस्ट 2019 रोजी अमरावती वन्यजीव बचाव पथकाच्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र, या बचाव पथकाचे कार्य 2013 पासून अतिशय जोमाने सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नन्नवरे यांच्या नेतृत्वात वनरक्षक अमोल गावनेर, मनोज माहुलकर, वनपाल सुरेश मनगटे, फिरोज खान, वनमजूर सतीश उमक, मनोज ठाकूर,मारुती कथलकर आणि रोजंदारीवर असणाऱ्या दोन वाहन चालक आणि एक मजूर या पथकात कार्यरत आहेत. अमरावती शहर आणि जिल्ह्यासह जळगाव, भुसावळ, पैठण, चाळीसगाव, यवतमाळ, पांढरकवडा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा विविध भागात मानवी वस्तीत शिरलेल्या वन्यप्राण्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पोहोचविण्याची जबाबदारी अमरावती वनविभागाच्या या बचाव पथकाने आजवर अनेकदा पूर्ण केली असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख वनपाल अमोल गावंनेर यांनीही 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

बचाव पथक अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज -

आपले नैसर्गिक अधिवास सोडून अनेकदा वन्यप्राणी हे मानवी वस्तीत शिरतात, अशा प्रसंगात वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचे बचाव पथक आपल्या प्राणाची बाजी लावून वन्यप्राण्यांना मानवी वस्तीतून सुरक्षित बाहेर काढतात. यावेळी अनेक अडचणींचा सामना करताना या बचाव पथकाकडे सुसज्ज असे शास्त्रही शासनाच्यावतीने पुरविण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी अशा शस्त्रांचा वापर केला जातो. आता नव्याने या पथकाकडे अमेरिकेतील ब्लूडार्ट कंपनीने निर्माण केलेली एक रायफल आणि एक पिस्टल देण्यात आली आहे. या अत्याधुनिक शास्त्रामुळे या पथकाला आपले कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणींवर सहज मात करता येते.

1105 प्राण्यांना मिळाले जीवनदान -

आपले नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीत वन्यप्राणी शिरल्याची माहिती मिळताच अमरावतीचे हे बचाव पथक त्वरित ज्या मानवी वस्तीच्या परिसरात वन्य प्राणी शिरले आहेत, त्या ठिकाणी पोहोचते. स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने अशा वन्यप्राण्यांना सुरक्षितरित्या पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. वाघ बिबट, अस्वल, काळवीट, माकड, नीलगाय, हरीण अशा अनेक वन्यजीवांना मानवी वस्तीतून सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी या पथकाने पूर्ण केली आहे. 2016 ते ऑगस्ट 2001 वीसपर्यंत या पथकाने एकूण 1105 वन्यप्राण्यांना जीवनदान दिले असल्याची माहितीही वनपाल अमोल गावनेर यांनी दिली.

बचाव पथकाच्या कार्यालयात अत्याधुनिक स्टोअर रूम -

एखाद्या परिसरात वन्यप्राणी शिरल्याची माहिती बचाव पथकाकडे येते. त्यावेळी वन्यप्राणी नेमका कुठे आहे, याची संपूर्ण माहिती पथक जाणून घेते. वन्यप्राणी विहिरीत पडला आहे का, किंवा दाट मानवी वस्तीत शिरला आहे का, याची संपूर्ण माहिती घेऊन त्या वन्यप्राण्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हवे असलेले नेमके कुठले साहित्य सोबत घ्यावे याचे व्यवस्थापन या पथकाकडून योग्यरीत्या केले जाते. या मोहिमेसाठी बचाव पथकाकडे योग्य असे कॅमेरा असणारे हेल्मेट, दोर, मोजमाप करण्यासाठी टेप, एअरगन, ड्रोन कॅमेरा, स्नेक हुक,फायबर स्टीक, स्ट्रेचर नेट, पाईप फुट पंप, औषध उपचाराची पेटी, ग्रीन नेट, ट्रॅप कॅमेरा, लाईफ जॅकेट, एअर पिलो, ब्राईट लाईट, टॉर्च असे विविध उपकरणे असतात. मोहीम फत्ते झाल्यावर हे उपकरण सुरक्षित राहावे, यासाठी बचाव पथकाच्या कार्यालयात अतिशय सुसज्ज अशी स्टोर रूमही आहे. नेमकी कुठली वस्तू कुठल्या खाण्यात ठेवली आहे, याची माहिती वनविभागाच्या या बचाव पथकात कार्यरत प्रत्येक व्यक्तीला आहे.

हेही वाचा - phone tapping case : सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचे समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details