महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा; खासदार नवनीत राणांचा आरोप

महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारही केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

By

Published : Aug 12, 2021, 9:32 PM IST

Updated : Aug 13, 2021, 3:00 PM IST

navneet rana
नवनीत राणा यांचे पत्र

अमरावती -राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारही केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर याला प्रत्यूत्तर देताना खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला, असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आले आहे, असा सवाल महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

नवनीत राणा यांचे पत्र
नवनीत राणा यांचे पत्र
नवनीत राणा यांचे पत्र

मेळघाटात तीन महिन्यात 49 बालमृत्यू -

महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य महत्त्वाचे घटक मिळाले नसल्याने गत तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात असे दुर्दैवी वास्तव आल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी स्मृती इराणी यांना दिलेल्या पत्रात खेद व्यक्त केला आहे.

ब्लॅक लिस्टेड कंपनीला कंत्राट -

उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले आहे. कंझुमर फेडरेशनमार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या लक्षात आणून दिले. या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

दोषींविरोधात एफआयआर नोंदवा -

आदिवासी माता किंवा नवजात शिशु यांच्यासाठी असणाऱ्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्यक्षात त्यांना न मिळता त्यांच्या वाटायचे पौष्टिक आहार संबंधित ब्लॅक लिस्टेड कंपनी व त्यांचे पाठीराखे हा मलिदा लाटत असून सखोल चौकशी झाल्यास हा महाभ्रष्टाचार 1000 ते 1500 कोटींचा असल्याचे सुद्धा निष्पन्न होऊ शकते, अशी भीतीही खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या घोटाळ्याप्रकरणात एफआयआर नोंदविण्याचे आदेश द्यावेत व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देखील खासदार राणा यांनी केली आहे.

खासदार राणांनीं माफी मागावी - यशोमती ठाकूर

खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे. त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आले, असा सवाल महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कुठल्या कंत्राटदारांसाठी हा आटापिटा सुरू आहे, असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचे काम देण्यात आले होते, कोविडमुळे काम ठप्प पडू नये म्हणून तीच रचना कायम ठेवण्यात आली होती, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,0 अशी मागणीदेखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

हेही वाचा - मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप

Last Updated : Aug 13, 2021, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details