नवी दिल्ली- महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब यासारख्या बिगर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रामधील भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेससह भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटकाळात जीएसटीचे पैसे थकित ठेवल्यामुळे केंद्र सरकारवर टीका केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की आम्ही भीक नाही तर थकित पैसे मागत आहोत. पश्चिम बंगालला केंद्र सरकारकडून ५३ हजार कोटी रुपये येणे आहे. केंद्र सरकारकडे निधी नाही. कर्मचाऱ्यांना वेतन देणे खूप कठीण आहे. खूप गंभीर स्थिती आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग संतप्त झाले. ते म्हणाले, की राज्याची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. सध्याच्या अंदाजानुसार पंजाबची चालू वर्षाखेर वित्तीय तूट २५ हजार कोटी रुपये होणार आहे. कोरोनाच्या समस्येवर मात करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. कधी कधी मी विचार करतो, मी वेतन आणि इतर भत्ते कसे देणार?यापूर्वीच आम्ही कोरोनावरील उपाययोजनासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.