नवी दिल्ली- कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या विषाणूजन्य रोगाचा देशातील येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर आणि जागतिक परिणाम होईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीने म्हटले आहे, की जागतिक व्यापारातील अनिश्चितता कमी होण्यासाठी निर्यात आणि गुंतवणुकीच्या चलनवलनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोरोना जगभरात पसरत असल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने भारतामधून चीनमध्ये जाणारी विमान सेवा स्थगित केली आहे. जगभरातील अनेक देशांनी सीमा बंद करत चीनमधील नागरिकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
अमेरिका-इराणमधील तणावाच्या स्थितीत खनिज तेलाचे व सोन्याचे दर वाढले होते, याची पतधोरण समितीने नोंद घेतली आहे. मात्र, मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर खनिज तेल व सोन्याचे दर कमी झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे.