महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेतकऱ्यांना दिलासा: केंद्र सरकारकडून गव्हासह हरभऱ्याच्या एमएसपीत वाढ

तेलबिया, मोहरींला देण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किमतीत २२५ रुपयांनी वाढ करून ४ हजार ४२५ रुपये करण्यात आला आहे. गतवर्षी तेलबिया आणि मोहरींना प्रति क्विटंल ४ हजार २०० रुपये देण्यात आला होता.

By

Published : Oct 23, 2019, 5:38 PM IST

संग्रहित - शेतकरी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विटंल ८५ रुपयांनी वाढवून १ हजार ९५ रुपये केली आहे. मसुरी, हरभरा, तेलबिया, मोहरी आणि सुर्यफुलाचीही किमान आधारभूत किंमत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारावरील समितीने (सीसीईए) मंजुरी दिली आहे.


कृषी मूल्य आयोगाने किमान आधारभूत किंमत वाढवावी, अशी केंद्रीय मंत्रिमंडळाला शिफारस केली होती, असे सूत्राने सांगितले. सीसीईएने चालू वर्षातील रब्बी हंगामात खरेदी करण्यात येणाऱ्या गव्हासाठी किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. गतवर्षी गव्हाला प्रति क्विटंल १ हजार ८४० रुपये किमान आधारभूत भाव देण्यात आला होता. यंदा गव्हाला १ हजार ९२५ रुपये किमान आधारभूत किंमत देण्यात येणार आहे.

  • बार्लीसाठीही किमान आधारभूत किंमत ८५ रुपयाने वाढवून १ हजार ५२५ रुपये करण्यात आला आहे. गतवर्षी प्रति क्विटंल १ हजार ४४० रुपये भाव देण्यात आला होता.
  • डाळींचे उत्पादन वाढविण्याकरिता सरकार लागवडीसाठी अधिक प्रोत्साहन देत आहे. त्याचाच भाग म्हणून मसुरीचा एमएसपी प्रति क्विटंल ३२५ रुपयांनी वाढवून ४ हजार ८०० रुपये केला आहे. गतवर्षी मसुरीला प्रति क्विटंल ४ हजार ४७५ रुपये भाव देण्यात आला होता.
  • हरभऱ्याचा भाव प्रति क्विंटल २५५ रुपयांनी वाढवून ४ हजार ८७५ रुपये करण्यात आला आहे. गतवर्षी हरभऱ्याला प्रति क्विटंल ४ हजार ६२० रुपये एमएसपी देण्यात आला होता.
  • तेलबिया, मोहरीला देण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किमतीत २२५ रुपयांनी वाढ करून ४ हजार ४२५ रुपये करण्यात आला आहे. गतवर्षी तेलबिया आणि मोहरींना प्रति क्विटंल ४ हजार २०० रुपये देण्यात आला होता.
  • सुर्यफुलाचीही किमान आधारभूत किंमत वाढविण्यात आली आहे. सुर्यफुलाचा प्रति क्विटंल भाव २७० रुपयांनी वाढवून ५ हजार २१५ रुपये करण्यात आला आहे. गतवर्षी सुर्यफुलाला प्रति क्विटंल ४ हजार ९४५ रुपये एवढी किमान आधारभूत किंमत देण्यात आली होती.

गहू हे रब्बीमध्ये घेण्यात येणारे मुख्य पीक आहे. गव्हाची पेरणी पुढील महिन्यात सुरू होत आहे. तर एप्रिलमध्ये गहु बाजारात उपलब्ध होणार आहे. एमएसपी म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान्याला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत असते.

ABOUT THE AUTHOR

...view details