महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2019, 2:28 PM IST

ETV Bharat / business

पीएमसी घोटाळा: ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची नोंद; मुंबईत सहा ठिकाणी छापे

ईडीने नोंदविलेल्या आरोपपत्रात एचडीआयएलचे कार्यकारी चेअरमन राकेश वाधवान आणि ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक असलेला मुलगा सारंग यांची नावे आहेत.

संपादित - वाधवान पिता-पुत्र

नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने पीएमसीमधील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलच्या प्रवर्तकांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. ईडीने मुंबईत सहा ठिकाणी छापेही टाकले आहेत.

ईडीने हाउसिंग डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) कंपनीवर व त्यांच्या प्रवर्तकांवर एफआयआर समकक्ष असलेला ईसीआयआर (अंमलबजावणी प्रकरण तपास अहवाल) गुन्हा नोंदविला आहे. या कंपनीच्या प्रवतर्कांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी (पीएमएलए) गुन्हा नोंदिवत ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने नोंदविलेल्या आरोपपत्रात एचडीआयएलचे कार्यकारी चेअरमन राकेश वाधवान आणि ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक असलेला मुलगा सारंग यांची नावे आहेत.

वाधवान आणि त्याचा मुलगा सारंगची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू-

मुंबई पोलिसांनी राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांना गुरुवारी अटक केली आहे. दोन्ही आरोपीवर पीएमसी बँकेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने वाधवान पिता-पुत्रांना समन्सही बजावले होते. मात्र, त्यांनी चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे मुख्य राजवर्धन सिन्हा म्हणाले, आम्ही दोघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा-पीएमसी बँकेतून आता काढता येणार २५ हजार रूपये...


एचडीआयएल ही दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असल्याचे बोलले जात आहे. याच ग्रुपने पीएमसी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली होती. पीएमसी बँकेचे वसुली विभागाचे व्यवस्थापक जसबीर सिंग मट्टा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बँकेकडून घेण्यात येणारे कर्ज लपविण्यासाठी बनावट २१ हजार ४९ बँक खाती तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

हेही वाचा-आरबीआयकडून पतधोरण जाहीर.. व्याजदर आणखी स्वस्त; रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात

दरम्यान, ठेवीदारांची अडचण कमी करण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा २५ हजार रुपयांवर नेण्याचा आरबीआयने गुरुवारी निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details