जळगाव- हौसेला मोल नसते, असे म्हणत अनेकजण सोन्याची खरेदी करतात. मात्र तीन दिवसात तब्बल १२०० रुपयाने सोन्याचे प्रति तोळा दर वाढल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. सोन्याची बाजारपेठ असल्याने जळगावला सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. याचा फटका येथील सोन्याच्या बाजारपेठेला बसत आहे. आधीच दुष्काळामुळे ग्राहकांची कमी मागणी त्यात दरवाढ, याचा परिणाम म्हणून सोन्याच्या बाजारपेठेत मंदी असल्याचे चित्र आहे.
स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर गेल्या तीन दिवसात तब्बल १ हजार १०० रुपये ते १२०० रुपयांनी वाढले आहेत. जळगावात शनिवारी सकाळी सोन्याचा दर प्रति तोळा ३४ हजार ४०० रुपये एवढा झाला. चालू आठवड्यात तीन ते चार दिवसांपूर्वी सोन्याचा दर ३३ हजार २०० ते ३३ हजार ३०० रुपये प्रति तोळा होता. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत सतत वधारत असल्याने सोन्याचे दर वाढतच आहेत.
एरवी अक्षय्य तृतीयेनंतर लग्नसराई आटोपत असल्याने सोन्याची मागणी घटते. त्यामुळे सोन्याचे दर कमी होतात किंवा स्थिर राहतात, असे बाजारपेठेमधील स्थिती असते. मात्र, यंदा अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर सतत वाढत आहेत. आधीच दुष्काळामुळे सोन्याची मागणी घटली आहे. त्यातच दर सतत वधारत असल्याने ग्राहक सोने खरेदीसाठी पुढे सरसावत नाही. त्यामुळे सराफ बाजारात मंदी दिसून येत आहे.
यावर्षी मार्च महिन्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर ३३ हजार रुपये प्रति तोळा झाला होता.