महाराष्ट्र

maharashtra

शिवसेना नेत्यांकडून व्यापाऱ्यांची पिळवणूक करून नंतर प्रश्न सोडविण्याचे नाटक - राजन तेली

By

Published : Jul 5, 2020, 7:15 PM IST

२०१९-२० सालचा जिल्हा विकासाचा आराखडा 225 कोटींचा होता. मात्र मंजूर किती झाला, तर फक्त 1.42 कोटी आणि त्यातही 33% कट लागला मग राहिले काय ? जिल्ह्याचा विकास कोणत्या निधीतून करणार ? चांदा ते बांदा ही चांगली योजना होती, ती सरकारने बंद केली, दुसरी योजना फक्त कागदावरच आहे. सिंधुदुर्गचा विकास कसा करणार ? उत्तर द्या, विकासनिधी कसा आणणार ते जनतेला सांगा, असा प्रश्नही राजन तेली यांनी उपस्थित केला आहे.

BJP leader Rajan teli
BJP leader Rajan teli

सिंधुदुर्ग - जिल्हाभर गरज नसताना सर्वत्र लॉकडाऊन लावायचे, जनतेला त्रास द्यायचा, व्यापाऱ्यांवर नाना प्रकारची बंधने घालायची आणि भाजपने व्यापाऱ्यांची बाजू घेऊन बंदला पाठिंबा देताच आपणच कडक केलेले लॉकडाऊन शिथिल करण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा. हा सर्व प्रकार म्हणजे शिवसेना सत्ताधाऱ्यांचा 'तुघलकी कारभार' आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा प्रकार म्हणजे आधी चूक करून नंतर 'आम्ही करून दाखवले ' अशी ओरड करण्याचा प्रकार आहे. असेही तेली म्हणाले.

कोरोनाचे संकट ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणीच लॉकडाऊन करण्याची गरज असताना सर्वत्र कडक बंदी केली. त्यात दारूची दुकाने सुरू आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. मात्र शेतीला लागणारी वेगवेगळी खते जिल्ह्यात नाही. त्यात लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस घरा बाहेर पडू शकत नाही. या सरकारला सामान्य शेतकरी जगवायचा आहे की मारायचा ? असा संतप्त सवाल तेली यांनी केला. पालकमंत्री सामंत यांनी व्यापाऱ्यांसोबत झूम अॅपवरून व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. हा झूम अॅप चीनचा आहे. यातूनच तुमची देशभक्ती काय आहे ती दिसते. ऑनलाईन ऑर्डर केल्यावर फ्लिपकार्ट, अमेझॉन अशा कंपन्यांची ऑर्डर घरपोच येते. मात्र ती वस्तू जिथून येते तो भाग मुख्य शहरांमधील कोरोनाचा रेडझोन असलेला परिसर आहे. म्हणजे बंदी कोणावर घातली पाहिजे त्यांना मोकळे सोडून सामान्य व्यापारी, शेतकरी व गरिबांना लॉकडाऊनमध्ये भरडण्याचे काम हे सत्ताधारी करत असल्याचे तेली म्हणाले.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी आणि शिवसेनेचे नेते प्रशासनाला हाताशी धरून आपण सत्ताधारी आहोत, वाट्टेल ते निर्णय घेऊ शकतो हे दाखविण्यासाठी असे 'तुघलकी' निर्णय घेत आहेत. व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय करण्याचे काम ते करत आहेत. अशी टीका तेली यांनी केली.

तसेच, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या वलग्ना करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या 5 वर्षात आरोग्य मंत्रीपद स्वतःकडे ठेवून सिंधुदुर्गला काय दिले याचे उत्तर द्यावे. कुडाळ, देवगड, वेंगुर्ले येथे ठोकळे पद्धतीची रुग्णालये बांधलीत, तिथे प्रथम डॉक्टर द्या,आरोग्य विभागातील सिंधुदुर्गची रिक्त असलेली 534 पदे आधी भरा नंतर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधा, असा सल्ला तेली यांनी दिला आहे.

19-20 सलचा जिल्हा विकासाचा आराखडा 225 कोटींचा होता. मात्र मंजूर किती झाला, तर फक्त 1.42 कोटी आणि त्यातही 33% कट लागला मग राहिले काय ? जिल्ह्याचा विकास कोणत्या निधीतून करणार ? चांदते- बांदा ही चांगली योजना होती, ती सरकारने बंद केली, दुसरी योजना फक्त कागदावरच आहे. सिंधुदुर्गचा विकास कसा करणार ? उत्तर द्या, विकासनिधी कसा आणणार ते जनतेला सांगा. असा प्रश्नही राजन तेली यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details