जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. ब. गो. शानभाग विद्यालयाची समीक्षा विजय लुल्हे ही विद्यार्थिनी ९९.८० टक्के गुण मिळवून जळगावातून अव्वल ठरली आहे. तसेच नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयातील माहेश्वरी दीपक नारखेडे हिने ९९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
कै. ब. गो. शानभाग विद्यालयाने यावर्षीदेखील दहावीच्या निकालात आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शानभाग विद्यालयाचे विद्यार्थी अव्वलस्थान पटकावत आहेत. यावर्षी तर शानभाग विद्यालयाने 'हॅट्ट्रीक' साधली आहे. २०१८ मध्ये विशाखा कुलकर्णी या विद्यार्थिनीने जळगावात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर २०१९ मध्ये प्रज्ज्वल पाटील याने तर आता समीक्षा लुल्हे हिने ९९.८० टक्के मिळवून अव्वलस्थान मिळवले आहे. समीक्षाने घवघवीत यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आजोबा सुपडू लुल्हे, आजी सिंधू लुल्हे तसेच वडील विजय व मोठी बहीण सुवर्णा यांनी पेढा भरवून तिचे कौतुक करत घरीच आनंदोत्सव साजरा केला.
दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या समीक्षाला वाणिज्य क्षेत्रात करिअर करायचे असून, सीए व्हायची तिची इच्छा आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असल्याचे तिने सांगितले. वाणिज्य क्षेत्राविषयी लहानपणापासून आकर्षण असल्याने तिचे गणित विषयावर अधिक लक्ष असते. म्हणूनच प्रत्येक वर्षी शाळेसोबत अबॅकसचे क्लासेस देखील ती लावत असते. दहावीची परीक्षा ही बोर्डाची परीक्षा असते, खूप मेहनत घ्यावी लागते, अशा प्रकारचा कोणताही बाऊ न करता, मनावर ताण न घेता मी परीक्षेला सामोरे गेले. घोकंपट्टी करण्यापेक्षा नेमका अभ्यासक्रम समजून घेऊन मेहनत घेतली. विशेष म्हणजे, मला खेळायची आवड आहे. खेळांमुळे एकाग्रता टिकवणे मला सोपे गेले. परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. त्यामुळेच मला यश मिळाले, असे गमक समीक्षाने सांगितले.