महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 23, 2020, 6:43 PM IST

Updated : Jun 23, 2020, 6:51 PM IST

ETV Bharat / briefs

कल्याण-डोंबिवलीत 181 अतिधोकादायक इमारती, पावसाळ्यात शेकडो जीव टांगणीला

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोरोनाची साथ सुरू असताना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. महापालिकेच्या 10 विभागांतील 283 धोकादायक व 181 अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. मात्र, महापालिकेने अशा इमारतींना नोटिसा देऊन आपले कर्तव्य पार पडल्याची भावना ठेवल्याचे दिसत आहे.

कल्याण-डोंबिवलीत 181 अतिधोकादायक इमारती,
कल्याण-डोंबिवलीत 181 अतिधोकादायक इमारती,

ठाणे - कोरोनाच्या संकटाचा फेरा अजूनही कमी होताना दिसत नाही आणि त्यातच पावसाळ्याला थोडी सुरुवातही झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 181 अतिधोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन रहाणाऱ्या नागरिकांना 265ची नोटीस दिली आहे.

एकीकडे कोरोना महामारीची धास्ती, तर दुसरीकडे पावसाळ्याच्या दिवसांत धोकादायक इमारतींचा प्रश्न नेहमीप्रमाणे ऐरणीवर आला आहे. तर, अशा इमारतींत राहणारी शेकडो कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहात आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोरोनाची साथ सुरू असताना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. महापालिकेच्या 10 विभागांतील 283 धोकादायक व 181 अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. मात्र, महापालिकेने अशा इमारतींना नोटिसा देऊन आपले कर्तव्य पार पडल्याची भावना ठेवल्याचे दिसत आहे.

या अतिधोकादायक इमारतींत शेकडो कुटुंबांनी दुसरा पर्याय म्हणून आहे, तिथेच राहण्याचे ठरविले आहे. कारण, पालिकेने गेल्या 25 वर्षांत संक्रमण शिबिरे बांधली नाहीत. तसेच आपल्याला पुन्हा त्याच इमारतीत जागा मिळेल, यावर रहिवाशांचा विश्वास बसत नाही. ज्या इमारतींना 30 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यांना कलम 265 अंतर्गत नोटीस दिली आहे. पालिकेने जी आकडेवारी जाहीर केली, त्यानुसार कल्याणमधील 'क' प्रभागात 102 व डोंबिवलीतील ‘ग’ प्रभागात 32 इमारती जास्त धोकादायक असल्याचे जाहीर केले. तथापि, ऐन पावसाळ्यात या कुटुंबीयांनी सर्व संसार कुठे न्यायचा, याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. त्यामुळे, प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार केल्याचे दिसत नसल्याची परिस्थिती आहे. अशा अनेक जुन्या इमारतींची, बंगल्यांची प्रकरणे कोर्टात आहेत. तरीही बिल्डर व राजकीय दबाव म्हणून त्यांना पण नोटीस देऊन प्रशासन मोकळे झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नशिबावर भरवसा ठेवून ही कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहात आहेत.

या संदर्भात प्रसिद्ध स्ट्रक्चरल ऑडिटर माधव चिकोडी यांना विचारले असता ते म्हणाले, यंदा महापालिकेने कोणतीही विचारणा केलेली नाही. दरवर्षी आमच्याकडे हे काम दिले जाते. पण यंदा सर्वच कोरोनाच्या गडबडीत आहेत. गेल्या वर्षी ज्या अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या. त्यातील 10 - 12 टक्के इमारतींचे सर्वेक्षण नीट होणे गरजेचे आहे. अनेक इमारतींना बाहेरून प्लास्टर नाही, टेकू लावण्यात आले आहेत, याकडे चिकोडी यांनी लक्ष वेधले. तर, या विभागाचे अधिकारी महेश गुप्ते म्हणाले, सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. काही इमारत मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला आहे. तर, नियमानुसार 283 धोकादायक व 181 अतिधोकादायक इमारतींना कलम 265 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 23, 2020, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details