मुंबई- कोरोना संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली होती, परंतु मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्या जिल्ह्यात आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामुळे आणि महास्वयम वेबपोर्टलच्या साहायाने तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. तर, 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यसपीठांवरून 1 लाख 72 हजार 165 बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
तसेच, नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विभाग प्रयत्न करत आहे, अशी माहिती देखील नवाब मलिक यांनी दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत असमल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
मागील 3 महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर 1 लाख 72 हजार 165 इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात 24 हजार 520, नाशिक विभागात 30 हजार 145, पुणे विभागात 37 हजार 562, औरंगाबाद विभागात 35 हजार 243, अमरावती विभागात 14 हजार 260 तर नागपूर विभागात 30 हजार 435 इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.