महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 4:40 PM IST

ETV Bharat / bharat

ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास

Revanth Reddy : तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी हे एकेकाळी भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. आता ते कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत.

Revanth Reddy
Revanth Reddy

हैदराबाद Revanth Reddy :तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बहुमताचा आकडा ओलांडला असून, पक्षानं के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारला जोरदार धक्का दिला आहे. या विजयासह कॉंग्रेसनं दक्षिण भारतातील आपलं स्थान आणखी मजबूत केलं. निकालानंतर, राज्य काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून उदयास आले आहेत. विशेष म्हणजे, रेवंत रेड्डी एकेकाळी भाजपाची युवा आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) सदस्य होते!

तेलुगु देसम पक्षात होते : रेवंत रेड्डी हैदराबादच्या ओस्मानिया विद्यापीठातून पदवीधर आहेत. या दरम्यान ते एबीव्हीपीत होते. २००७ मध्ये रेवंत रेड्डी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते तेलुगु देसम पक्षात सामील झाले. २०१४ मध्ये त्यांनी कोडंगल मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४६.४५ टक्के मतांसह विजय मिळवला. २०१४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा याच जागेवरून ३९.०६ टक्के मतांनी विजयी झाले.

२०१७ मध्ये काँग्रेस प्रवेश : रेवंत रेड्डी यांनी २०१७ मध्ये टीडीपीला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी २०१८ ची तेलंगणा विधानसभा निवडणूक कोडंगलमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढली. मात्र ते तेलुगु राष्ट्र समितीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. कोणत्याही निवडणुकीतील हा त्यांचा पहिला पराभव होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मलकाजगिरी येथून १०,९१९ मतांच्या फरकानं विजय मिळवत खासदार झाले.

मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात उभे राहिले : जून २०२१ मध्ये त्यांची एन. उत्तम कुमार रेड्डी यांच्या जागी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यशैली बदलल्याबद्दल रेवंत रेड्डी यांच्यावर काँग्रेसमधूनच टीका झाली होती. परंतु पक्षाच्या हाय कमांडनं त्यांना पाठिंबा दिला. तेलंगणाच्या निवडणुकीत पक्षानं त्यांना मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात उभं करत मोठा संदेश दिला.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर : आता कर्नाटक पाठोपाठ तेलंगणामधील विजयामुळे दक्षिण भारतात काँग्रेसचं अस्तित्व आणखी मजबूत होईल. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे राज्यात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री निवडूण येणं. सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रेवंत रेड्डी यांचं नाव आघाडीवर आहे. हाय कमांडचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे आता भाजपाची पोटशाखा असलेल्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य कॉंग्रेसचा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता नाकारता येत नाही!

हेही वाचा :

  1. साडेसहाव्या वर्षी घर सोडलं, आता राजस्थानमध्ये भाजपासाठी गेमचेंजर! जाणून घ्या कोण आहेत बाबा बालकनाथ

ABOUT THE AUTHOR

...view details