महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 12, 2021, 1:19 PM IST

ETV Bharat / bharat

उत्तराखंड हिमस्खलन: सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू; ३६ मृतदेह सापडले २०६ बेपत्ता

ऋषीगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने काही काळ बचावकार्य थांबले होते. तपोवन येथील बोगद्यात आणखी ३० कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बचावकार्य सुरू
बचावकार्य सुरू

चमोली - उत्तराखंडमधील जोशीमठ येथील हिमस्खलन होऊन सहा दिवस झाले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार ३६ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही २०६ जण बेपत्ता आहे. तपोवन आणि ऋषीगंगा उर्जा प्रकल्पातील बोगद्यातून चिखल, माती काढण्याचे काम सुरू असून बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.

नदीची पाणीपातळी वाढल्याने बचावकार्य खोळंबले होते -

ऋषीगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने काही काळ बचावकार्य थांबले होते. तपोवन येथील बोगद्यात आणखी ३० कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आत्तापर्यंत चिखलाच्या ढिगाऱ्यातून ३६ मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. तर २०४ कामगार अद्यापही बेपत्ता आहेत. नदीकिनारी राहणारे गावकरीही या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दोन उर्जा प्रकल्पावर काम करणारे कामगार अडकले -

ऋषीगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्क केले आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन रेणी भागात हिमस्खलन झाल्याने अचानक पूर आला. या धौली गंगा आणि ऋषीगंगा नदीमार्गावर दोन उर्जा प्रकल्पांचे काम सुरू होते. येथे शेकडो कामगार काम करत होते. अचानक पूर आल्याने यात अनेक कामगार वाहून गेले. तर काही जण उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, केंद्रीय सीमासुरक्षा बल, पोलीस आणि अनेक स्वसंयसेवी संस्थांकडून बचावकार्य सुरू आहे. जेसीबीच्या माध्यमातून बोगद्यातील चिखल काढण्याचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गाळ आल्याने मजूर चिखलात गाडले गेल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details