नुह (हरियाणा): भिवानीमध्ये जळालेल्या बोलेरोमध्ये दोन तरुणांचे सांगाडे सापडल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. एकीकडे मृतांचे नातेवाईक याला हत्येचा कट म्हटले आहे. तर दुसरीकडे नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि सीआयए पोलिस फिरोजपूर झिरका यांनी मिळून दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही तरुणांना गाडीत बांधून गाडीला आग लावली. त्यामुळे दोन्ही तरुणांना जिवंत जाळण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांच्या वक्तव्यावर नूहचे एसपी वरुण सिंगला यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नूहचे एसपी वरुण सिंगला यांनी कुटुंबीयांचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
बेपत्ता झाल्याची होती तक्रार:भिवानी येथील बारवास गावात जळालेल्या बोलेरो कारमध्ये सापडलेल्या सांगाड्याची ओळख आज पटली. मृत दोघे हे जुनेद आणि नसीर आहेत. हे दोघेही राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील घाटमिका गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दोघेही व्यवसायाने ड्रायव्हर म्हणून काम करत होते. दोन्ही तरुणांच्या नातेवाइकांनी बुधवारी स्थानिक पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याआधारे दोन्ही तरुणांची ओळख पटवण्यात आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर 24 तासांनंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह भिवानी जिल्ह्यातील बरवास येथील बानी गावात जळालेल्या बोलेरो कारमध्ये सापडले होते.
पोलिसांनी गाडी थांबवल्याचा आरोप:जुनैद आणि नसीरचा भाऊ इस्माईल यांनी सांगितले की, दोन्ही भाऊ सासरच्या घरून स्वतःच्या घरी येत होते. रस्त्यात सीआयए पोलिसांनी फिरोजपूर झिरका गाडी थांबवून त्यांची नावे विचारली. त्यानंतर दोघांना कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बजरंग दलाचे लोकही उपस्थित होते. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी जुनैद आणि नसीर यांनी कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिरोजपूर सीआयए टीमने त्यांच्या कारला समोरून धडक दिली आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या कारला मागून धडक दिली. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही तरुणांना बेदम मारहाण करून अर्धमेले करून टाकले.