पाटणा :बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांमुळे खळबळ उडाली होती. यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच महादेवा घाटावर ७१हून अधिक मृतदेह मिळाले होते, तर आता नाथ बाबा घाटावर आणखी आठ मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान, बिहारसोबतच उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्येही असेच मृतदेह आढळून आले होते.
नाथ बाबा घाटावरील मृतदेहांची परिस्थितीही विदारक..
नाथ बाबा घाटावर आढळून आलेल्या मृतदेहांची परिस्थीतीही आधीच्या मृतदेहांप्रमाणे विदारक आहे. परिसरात फिरणारी भटकी कुत्री या मृतदेहांचे लचके तोडताना दिसून येत आहेत. यामुळे गंगेत गेल्या काही दिवसांपासून एवढे मृतदेह कुठून येत आहेत हा प्रश्न पुन्हा वर आला आहे.
यापूर्वी दहा मे रोजी महादेवा घाटावर ७१ मृतदेह आढळून आले होते. कित्येक अधिकाऱ्यांनी हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आल्याचा दावा केला आहे. तर, उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी हे दावे फेटाळले आहेत.