नवी दिल्ली - रायगड जिल्ह्यातील तळई गावात भूस्खलन झाल्याने जवळपास 36 जणांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळई गावात झालेल्या या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याच्या घटना समोर आल्या आहेत. घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत करून दुर्घटनेचा आढावा घेतला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राष्ट्रपतींनी म्हटले आहे, की महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे झालेल्या जीवितहानीचे वृत्त अत्यंत दुखद आहे. परमेश्वर मृतांच्या परिजनांना हा आघात सहन करण्याची शक्ती दे. मला विश्वास आहे, की केंद्र व राज्य सरकारच्या मदत व बचाव कार्यामुळे पीडितांना दिलासा मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्विट करून म्हटले आहे, की महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
त्याचबरोबर पीएमओकडून ट्विट करण्यात आले असून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले, की महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे झालेली दुर्घटना अंत्यंत वेदनादायी आहे. मी यासंदर्भात सीएम उद्धव ठाकरे आणि एनडीआरएफचे डीजी एस.एन. प्रधान यांच्याशी बातचीत केली आहे. एनडीआरएफची पथके मदत व बचाव कार्यात गुंतली आहेत. केंद्र सरकारकडून हरसंभव मदत करण्यात येईल.
महाड तळई गावात दरड कोसळली आहे. यात जवळपास ५० ते ६० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यातील ३६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौैधरी यांनी दिली आहे. या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे पथकाला घटनास्थळी पोहचण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर आज सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे.जिल्ह्यात विविध तीन घटनांमध्ये लहान मुलींसह तीन जण पाण्यात वाहून गेले आहेत. ही माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.एनडीआरएफ, कोस्ट गार्ड पथक पुराच्या पाण्यात अडकल्याने बचावकार्यास वेळ लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. तरीही पाऊस कमी झाल्यानंतर बचाव कार्य सुरू होईल. पावसाचा जोर अजून सुरू असल्याने बचावकार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.