नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात शनिवारी पहाटे बस खड्ड्यात पडून किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे.
अमित शाह यांचे ट्विट : झालेल्या अपघातावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ते या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले आहेत. ट्विट करत अमित शाह म्हणाले की, 'महाराष्ट्रातील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. या संदर्भात मी राज्याचे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो'.
12 प्रवाशांचा जागीच मृत्यू : मुख्यमंत्री शिंदे यांनी पनवेलच्या कळंबोली येथील खासगी रुग्णालयात जाऊन बस अपघातातील जखमींची भेट घेतली आहे. रायगडच्या खोपोली परिसरातही त्यांनी भेट दिली. येथेच पुण्याहून मुंबईकडे निघालेली खासगी बस दरीत कोसळली होती. या अपघाताबाबत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते. त्यातील 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बाकीच्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. ज्यांना जीव गमवावा लागला त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळेल.
क्रेनच्या सहाय्याने बचाव : या आधी रायगड पोलीस अधीक्षक (एसपी) यांनी माहिती दिली की, घटनास्थळी बचावासाठी क्रेन मागवण्यात आली होती. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये बस खड्ड्यात पडल्याचे दिसून आले. अपघातात बसच्या खिडक्या आणि छताचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. बसमधील प्रवासी गोरेगाव परिसरातील एका संस्थेचे असून ते पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते परतीच्या प्रवासाला निघाले होते.
हेही वाचा :Raigad Bus Accident : खोपोलीतील दरीत बस कोसळून 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून एकूण 7 लाखांची मदत जाहीर