लखनऊ - लखीमपूर खेरी हिंसाचाराचे महत्त्वाचे साक्षीदार आणि भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलबाग सिंग यांच्यावर मंगळवारी रात्री हल्ला झाला. ( attack on the witness of Lakhimpur violence ) दिलबाग सिंग यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अनेक राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दिलबागसिंग बाल-बाल बचावले आहेत. या घटनेवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, लखीमपूर शेतकरी हत्याकांडात शेतकऱ्यांच्या न्यायाचा आवाज बनलेल्या लोकांवर गोळीबार करणारे हे कोण आहेत? ते कोणाच्या संरक्षणाखाली काम करत आहेत? 'बुलेटराज' निर्माण करणाऱ्या या लोकांवर भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्थेचा बुलडोझर फिरवणार का? असा घाणाघात त्यांनी केला आहे.
मंगळवारी रात्री गोला कोतवाली भागातील अलीगंज-मुडा रस्त्यावरून दिलबाग सिंग आपल्या घरी परतत असताना हा हल्ला झाला. मात्र, या हल्ल्यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.