मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेने दोन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी उमेदवार मैदानात आहे. पण, भाजपने आता तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्याजागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तेही कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या ६ जागांपैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे.
भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, यापुर्वीच शिवसेनेने छत्रपती संभाजी राजे यांना तिकीट नाकारत शिवसेनेचे संजय राऊत आणि कोल्हापूरचे संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
काय आहे संख्याबळ? -सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर, भाजपकडे 113 आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.