महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CM Eknath Shinde in Ayodhya : बाळासाहेब ठाकरेंचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमच्या अयोध्या यात्रेवर काहीजण खूश नाहीत. काहींना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. शिवसेना आणि भाजपची विचारधारा सारखीच आहे. बाळासाहेब ठाकरेंचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे वडिलांच्या वारशाच्या विरोधात गेले, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते अयोध्येत बोलत होते.

By

Published : Apr 9, 2023, 5:57 PM IST

Updated : Apr 9, 2023, 7:02 PM IST

cm eknath shinde ayodhya
एकनाथ शिंदे अयोध्या दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अयोध्या(उत्तर प्रदेश) -अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर बांधणे हे लाखो राम भक्तांचे स्वप्न होते जे पंतप्रधानांनी साकार केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी प्रथमच अयोध्येत आलो आहे. प्रभू रामाच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव मिळाले आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकीय विषय नसून आमची श्रद्धा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप, शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते उपस्थित होते.

रामलल्लाचे घेतले दर्शन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना भाजपच्या मंत्र्यांनी आज रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार, आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राम मंदिराच महाआरती करण्यात आली. सुरुवातीला हनुमान गढीचे दर्शन घेतले व नंतर या सर्वांनी राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मण किल्ला येथेही भेट दिली.

हिंदुत्वावरून विरोधकांवर टीका -विरोधक आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्या यात्रेबाबत तुम्ही जे दृश्य पाहत आहात, ती शिवसेना आणि भाजपसाठी आनंदाची बाब आहे, पण काही लोकांना यामुळे वेदना होत आहेत. अयोध्येतील आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पोटातही दुखत आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकांना हिंदुत्वाची जाणीवपूर्वक ऍलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेकजण जाणीवपूर्वक हिंदुत्वाचा अपमान करत आहेत. गैरसमज पसरवत आहेत. हिंदू धर्म ही जीवनपद्धती आहे.

मोदी सरकार आल्यावर हिंदुत्वाचा आदर वाढला - हिंदुत्व इतर धर्माचा अनादर करत नाही. सर्वांच्या पाठिंब्याने हिंदु धर्म पुढे जाणार आहे. पण, हिंदुत्व घराघरात पोहोचले तर आपली राजकीय दुकानदारी बंद होईल, असे काहींना वाटते. आमचा राजकयी व्यवसाय ठप्प होईल असेही अनेकांना वाटते. एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व विचारधारेचे सरकार आल्यावर हिंदुत्वाचा जागर झाला, आदर वाढला.

उद्धव ठाकरेंवर निशाणा - एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी आमची सर्वांची इच्छा होती. कारण आम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली. पण, निवडणूक लढवल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढतात. काही स्वार्थ आणि खुर्चीच्या लालसेपोटी चुकीचे पाऊल उचलले गेले. पण, आम्ही आठ ते नऊ महिन्यांत ते दुरुस्त केले.

लोकसभा निवडणुकीत भगवा फडकणार - लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, २०२४ मध्ये शिवसेना-भाजप युती पूर्ण बहुमताने भगवा फडकवेल. अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधणार आहोत. यासाठी आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहोत.

हेही वाचा -CM DCM Visited Ayodhya : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; मंदिर उभारणी कामाची केली पाहणी

Last Updated : Apr 9, 2023, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details