नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातल्याने जागतीक आरोग्य धोक्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून कोरोना लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना अखेर दिलासा मिळला आहे. अखेर भारतामध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यातच कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सवरून आणि प्रभावीपणावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचप्रमाणे नागरिकांना लस टोचण्यापूर्वी राष्ट्र प्रमुखांनी लस घेतली नसल्याने विरोधकांनी मोदींवर टीकाही केली होती.
कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण प्रक्रिया देशभर सुरू आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. आता याच अनुक्रमे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि 50 वर्षांवरील नेत्यांना कोरोनाची लस दिली जाईल. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. यावेळी सात लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना लसीच्या दुसर्या टप्प्यात सैन्य, निमलष्करी दलाचे जवान आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस दिली जाईल. तथापि, कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरू होईल, हे अद्याप समजू शकले नाही.