नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 80 वा भाग होता. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या कार्यक्रमात मोदींनी टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकममधील यशावर तसेच तरुणांमध्ये खेळाप्रती निर्माण झालेल्या उत्सहावर भाष्य केले. तसेच त्यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी आज पुन्हा 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' घोषणेचा पुन्हा उल्लेख केला.
'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे -
अध्यात्म जपावं -
देशभरातील लोक भारतीय अध्यात्माविषयी खूप अभ्यास करतात. आपलेही हे कर्तव्य आहे की आपण या परंपरा जपल्या पाहिजे. कालबाह्य गोष्टी सोडून कालातीत गोष्टी कायम ठेवल्या पाहिजे, असे मोदी म्हणाले. तसेच सोमनाथ मंदिराशी संबंधित विविध विकासकामे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
खेळावर भाष्य -
मेजर ध्यानचंद यांच्यासारख्या लोकांनी नवा मार्ग तयार केला आहे. त्यावर चालत जाणे, ही आपली जबाबदारी आहे. अनेक वर्षांनंतर देशात असा कालखंड आला आहे की, खेळांशी आता कुटुंब, राज्य, राष्ट्र जोडले गेले आहेत. आता स्थानिक पातळीवर स्पर्धांचे आयोजन करुन खेळांचा विकास केला पाहिजे. खेळांविषयी सुरू असलेल्या चर्चा आता थांबू देऊ नका, सर्वांनी खेळायला हवे. आजचे युवक क्रीडा क्षेत्र आणि त्यातील संधींकडे लक्ष ठेवून आहेत.
युवकांवर भाष्य -
आजचे युवकांमध्ये नवे काही तरी निर्माण करण्याची इच्छ आहे. नव्या मार्गांचा अवलंब करायचा आहे. दिवस-रात्र मेहनत करुन पूर्ण क्षमतेने देशातील युवक स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत आहेत. देशातले अवकाश क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केले आहे. येत्या काळात देशातल्या अनेक युवकांनी तयार केलेले उपग्रह आपण लाँच करु शकू, अशी मला आशा आहे, असे मोदी म्हणाले. देशातील खेळण्यांना जगभरात बाजारपेठ देण्यासाठी युवक प्रयत्न करत आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे प्रमाण वाढविण्यासाठी युवक प्रयत्नशील आहेत.