अमरावती : आंध्र प्रदेशच्या एलुरु गावामधील ३००हून अधिक लोकांना एका अज्ञात आजारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील या गावामध्ये असणारे लोक गेल्या दोन दिवसांपासून अचानक बेशुद्ध पडत आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यांपैकी ४६ लोकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी १००हून अधिक रुग्णांची नोंद..
शनिवारी अचानक सुमारे १०० लोकांना या अज्ञात आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारीही या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. एकूण रुग्णांपैकी २२७ रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुमारे ७० रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, अतिगंभीर अशा पाच रुग्णांवर विजवाडाच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.