नवी दिल्ली : मणिपूर प्रश्नावरुन विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याची मागणी केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या मागणीला अद्यापही कोणता प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांनी मोदी सरकारवर लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. दोन्ही दिवस विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज स्थगित करावे लागले आहे. विरोधक आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Live Update :
- लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब :लोकसभेत विरोधकांनी सरकारविरोधातील अविश्वास ठराव तात्काळ चर्चेसाठी घेण्यासाठी चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा सभापतींनी अगोदर लोकसभा दिवसभरासाठी आणि त्यानंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्याचे घोषित केले.
- राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब :विरोधकांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातल्याने चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विरोधक राज्यसभा आणि लोकसभेतही आपल्या मागणीवर ठाम आहेत.
- लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब :मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधी खासदारांनी लोकसभेत मोठी घोषणाबाजी केली. विरोधक काहीच ऐकून घेण्याच्या तयारीत नसल्याने सभापतींनी लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब केली आहे.
मणिपूरची घटना देशासाठी लाजिरवाणी :मणिपूरची घटना देशासाठी लाजिरवाणी असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आल्याची माहिती बसपा खासदार मलूक नागर यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे मणिपूर प्रकरणाचे राजकारण करण्याची गरज नाही. संसदेच्या अधिवेशनात मणिपूर प्रकरणावर चर्चा व्हायला हवी. मणिपूर प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मतही बसपा खासदार मलूक नागर यांनी यांनी व्यक्त केले.
मणिपूर प्रकरण काँग्रेसमुळेच चिघळले :राहुल गांधी यांच्या राजकीय इतिहासाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचा हल्लाबोल भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांनी केला. राहुल गांधी अनेकदा चुकीची विधाने करतात. मणिपूर प्रकरणावरुन काँग्रेसला संसदेत चर्चा नको आहे. काँग्रेसला फक्त पंतप्रधान मोदींना प्रश्न करायचा आहे. मात्र काँग्रेसने आधी चर्चा करावी, त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील असेही जगन्नाथ सरकार यांनी यावेळी स्पष्ट केले. मणिपूर प्रकरणात काँग्रेसच्या चुकीमुळेच परिस्थिती चिघळल्याचा दावा खासदार जगन्नाथ सरकार यांनी केला. इंडिया नावाचा विरोधी गट स्थापन करुन विरोधक जनतेला मुर्खात काढण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -
- Parliament Monsoon Session 2023 : ठाकरे गटाच्या खासदारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, लोकसभा-राज्यसभा तहकूब
- Parliament Monsoon Session 2023 : निशिकांत दुबेंच्या 'सुपरफास्ट' प्रश्नांना नितीन गडकरींनी लावले ब्रेक; म्हणाले उपायोजना करुन दोषी अधिकाऱ्यांवर करणार कारवाई