नवी दिल्ली -आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेच्या कामाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ केला. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
तर राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यामुळे सुरुवातीला 12 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. मात्र, पुन्हा दुपारी एक वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाम स्थगित करण्यात आले आहे. इस्रायली स्पाइवेयर पेगाससच्या माध्यमातून राजकारणी, मंत्री, पत्रकार आणि काही प्रमुख लोकांवर पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते आनंद शर्मा यावेळी म्हणाले की, हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर तत्काळ चर्चा व्हायला हवी.
हेही वाचा -अदानी समुहाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविले
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांना काही मुद्दे मांडायचे होते. यावर लोकसभा अध्यक्ष ओमबिर्ला यांनी त्यांना सांगितले की, जर तुम्हाला काहीही सांगायचे असेल, तर त्याआधी तुम्हाला नोटीस द्यावी लागेल.