नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 19 विरोधी पक्षांची आभासी बैठक झाली. त्याला ज्येष्ठ विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकजुटीने लढण्यावर भर देण्यात आला. तसेच 20 ते 30 सप्टेंबरपर्यंत एकूण 10 दिवस देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी आपल्या मागण्यांची 11-कलमी सनदही सरकारकडे मांडली आहे.
ही बैठक सुमारे तीन तास चालली. बैठकीला उपस्थित 19 विरोधी पक्षांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, डीएमके, शिवसेना, जेएमएम, सीपीआय, सीपीएम, नॅशनल कॉन्फरेन्स, राष्ट्रीय जनता दल, एआययूडीएफ, व्हिसीके, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आरएसपी, केरळ काँग्रेस मणि, पीडीपी, आणि आययुएमएल यांचा समावेश आहे. काँग्रेसने आम आदमी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीला या आभासी बैठकीसाठी आमंत्रित केले नव्हते. तर सपाचा एकही नेता या बैठकीत सामील झाला नाही.
आपले अंतिम ध्येय 2024 च्या लोकसभा निवडणुका आहेत. यासाठी पद्धतशीरपणे योजना आखण्यास सुरुवात करावी लागेल. घटनेवर आणि स्वातंत्र्याच्या चळवळीवर विश्वास असलेले सरकार देशाला देणे हे एकमेव ध्येय हवे, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या. तर नेता कोण आहे, हे आपण विसरूया, आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवून. प्रत्येक विरोधी पक्ष एकत्र आला पाहिजे. एक मुख्य गट स्थापन करू आणि पुढील कृती-कार्यक्रम ठरवण्यासाठी एकत्र काम करू, असे टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारही बैठकीला उपस्थित होते. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्रित यायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
पश्चिम बंगाल आणि बिहारमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका या 2024 मध्ये होणाऱ्या मोठ्या लढाईसाठी प्रेरणा म्हणून काम करू शकतात. विरोधी पक्षांनी आपल्या निवडणूक मुद्द्यांना धार आणि नवीनता आणण्याची गरज असल्याचेही राजद नेते तेजस्वी यादव यांनी नमूद केले. जे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतात. ज्यांना आपल्या देशातील लोकशाही तत्त्वे आणि आचारसंहिता वाचवण्यासाठी एकत्र काम करायला आवडते, त्यांनी एकत्र आले पाहिजे, असे त्यांनी म्हटलं.