नवी दिल्ली - केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी २०१३ निर्भया फंडची घोषणा केली. २०१२ सालीच्या दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेची जगभरात चर्चा झाली होती. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षसाठी या फंडाची निर्मिती केली. या निधीतून राज्य सरकारांना महिला सुरक्षेसंबंधी विविध उपाययोजना राबवण्यासाठी मदत करण्यात येते. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातही केंद्र सरकारने निर्भया निधीची घोषणा केली.
२०१३ साली निर्भया फंडाची निर्मिती -
२०१३ साली जेव्हा निर्भया फंडाची उभारणी केली तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आत्तापर्यंत सरकारने ९ हजार २८८ कोटी रुपये या फंडाची तरतूद केली आहे. यातील ५ हजार सातशे कोटी रुपये जाहीर केले असून त्यातील ३ हजार ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. विविध मंत्रालयांना या फंडाअंतर्गत निधी देण्यात आला आहे. यासाठी तज्ज्ञ समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.