रायपूर :छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी याठिकाणी १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यांपैकी तिघांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 'लोन वर्राटू' अभियानाचे हे यश मानले जात आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल ३१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यांपैकी ७७ नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
भूमकाल दिनी केले आत्मसमर्पण..
पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले, की भूमकाल दिनाच्या पार्श्वभूमीवर, लोन वर्राटू अभियानामुळे प्रेरित झालेल्या १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या सर्वांना नक्षलवादी विचारसरणीतील पोकळपणा लक्षात आल्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण केले. सध्या लोन वर्राटू अभियानांतर्गत अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत.