नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे की, आई, हा केवळ एक शब्द नव्हे तर आयुष्यातली अशी भावना आहे ज्यामध्ये सामावल्या आहेत वात्सल्य, धैर्य, विश्वास आणि अशा अपार भावना. जगातला कोणताही भाग असो, कोणताही देश असो, प्रत्येक मुलाच्या मनात आपल्या आईसाठी सर्वात अनमोल स्नेह भावना असते (Mothers austerity). आई, (Modis mother Hiraba) आपल्याला केवळ जन्मच देते असे नव्हे तर आपले मन, आपला आत्मविश्वास, आपले व्यक्तिमत्व ती घडवते. आपल्या मुलांसाठी ती आयुष्यभर झिजते, स्वतःला समर्पित करते. आज माझा आनंद, माझे भाग्य आपणा सर्वांसमवेत मी सामायिक (PM Modi writes blog dedicated to his mother) करू इच्छितो.
आई शेवटच्या क्षणापर्यंत तशीच आहे : माझी आई, हीराबा, आज 18 जूनला वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत आहे. म्हणजेच आईचे जन्म शताब्दी वर्ष सुरु होत आहे. वडील आज असते तर गेल्या आठवड्यात तेही शंभर वर्षांचे झाले असते. म्हणजे 2022 हे असे वर्ष आहे, ज्यामध्ये माझ्या आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे आणि याच वर्षात माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले आहे. ल्याच आठवड्यात माझ्या पुतण्याने गांधीनगर इथून आईचे काही व्हिडीओ पाठवले आहेत. सोसायटीमधले काही युवक घरी आले आहेत. वडिलांचे छायाचित्र खुर्चीवर ठेवले आहे, भजन-कीर्तन सुरु आहे, आई तल्लीन होऊन भजन म्हणत आहे. टाळ वाजवत आहे. आई आजही तशीच आहे. शरीर भले थकले असले तरी मनाची उर्जा तशीच कायम आहे.
जे काही चांगले ती आई-वडिलांची देणगी : खरे तर आमच्याकडे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही. मात्र कुटुंबातली नव्या पिढीतली मुले आहेत त्यांनी वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षात यावेळी 100 झाडे लावली.आज माझ्या जीवनात जे काही चांगले आहे, माझ्या व्यक्तीमत्वात जे काही चांगले आहेत ती आई-वडिलांची देणगी आहे.आज मी इथे दिल्लीत बसलो आहे, कितीतरी जुन्या आठवणी मनात फेर धरत आहेत. माझी आई जितकी सामान्य आहे तितकीच असामान्यही आहे. जशी सर्वांची आई असते अगदी तशीच. आज मी आई विषयी लिहित आहे, ते वाचून तुम्हाला असे वाटू शकेल, माझी आईही असेच तर करते. हे वाचताना तुमच्या डोळ्यासमोर तुमची आई येईल.
आई म्हणजे एक स्वरूप : आईची तपस्या, तिच्या अपत्याला आदर्श माणूस घडवते. आईचे वात्सल्य, तिच्या मुलामध्ये मानवी भाव-भावना जागृत करते. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, एक व्यक्तिमत्व नव्हे तर आई म्हणजे एक स्वरूप आहे. आपल्याकडे म्हटले जाते जसा भक्त तसा ईश्वर. त्याप्रमाणेच आपल्या मनात जसा भाव असेल त्याप्रमाणे आपण आईचे स्वरूप अनुभवू शकतो. माझ्या आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या विसनगर इथे झाला. वडनगर पासून हे फार दूर नाही. माझ्या आईला तिच्या आईचे म्हणजे माझ्या आजीचे प्रेम लाभू शकले नाही.
आईचे बालपण तीच्या आईविना गेले: शंभर पूर्वी आलेल्या जागतिक महामारीचा तेव्हा अनेक वर्षे प्रभाव राहिला होता. त्या महामारीने माझ्या आजीला, माझ्या आईपासून हिरावून नेले. आई तेव्हा काही दिवसांचीच असेल. तिला आपल्या आईचा, माझ्या आजीचा चेहरा, तिची कुशी काहीच आठवत नाही. आपण विचार करा, माझ्या आईचे बालपण आईविना गेले, तिला आपल्या आईकडे हट्ट करता आला नाही. आईने शाळेचा उंबरठाही पाहिला नाही, अक्षर ज्ञान प्राप्त करण्याचे भाग्य तिला लाभले नाही.तिने पाहिली ती केवळ गरिबी आणि घरात चोहीकडे अभाव.
ते दुःख तिला आजही सलते : आजच्या काळाशी तुलना केली तर आपण कल्पना करू शकतो की आईचे बालपण किती खडतर होते. कदाचित तिचे जीवन असेच घडवण्याची ईश्वराची इच्छा असेल. मात्र आपली आई गमावल्याचे, तिचा चेहराही न पाहिल्याचे दुःख तिला आजही सलते. लहानपणी केलेल्या संघर्षामुळे माझी आई अकाली प्रौढ झाली. आपल्या कुटुंबात ती सर्वात मोठी होती आणि लग्न झाल्यावर ती सर्वात मोठी सून झाली. लहानपणी ती आपल्या घरतल्या सर्वांची जशी चिंता करत असे, त्यांची काळजी घेत असे, घराचे सर्व कामकाज करत असे तशाच जबाबदाऱ्या तिला सासरी आल्यावर तिच्या अंगावर आल्या. या सर्व जबाबदाऱ्यामध्ये, या समस्यांमध्ये आई नेहमीच शांतपणे प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाचा सांभाळ करत राहिली.
ते मचाण आमच्या घरचे स्वयंपाकघर : वडनगरच्या ज्या घरात आम्ही राहत होतो ते घर अतिशय छोटे होते. त्या घराला खिडकी नव्हती, न्हाणीघर नव्हते, शौचालयही नव्हते. मातीच्या भिंती आणि खापराचे छत असलेला एक-दीड खोल्यांचा तो ढाचा म्हणजे आमचे घर होते. त्यामध्ये आई-वडील,आम्ही सर्व बहिण-भावंडे राहत होतो. त्या छोट्याश्या घरात आईला स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे म्हणून वडिलांनी घरात बांबूच्या पट्ट्या आणि लाकडाच्या फळ्या टाकून मचाणासारखे एक तयार केले होते. हे मचाण आमच्या घरातले स्वयंपाकघर होते. आई त्यावर बसून स्वयंपाक करत असे आणि आम्ही त्यावरच बसून जेवत असू.
अभाव असूनही घरात कधी तणाव नव्हता : सर्वसाधारणपणे जिथे अभाव असतो तिथे तणावही असतो. माझ्या आई-वडिलांचे हे वैशिष्ट्य होते की अभाव असूनही त्यांनी घरात तणाव कधी वरचढ होऊ दिला नाही. दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. कोणताही ऋतू असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, वडील पहाटे चार वाजता घराबाहेर पडत. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक ओळखत असत, चार वाजले, दामोदर काका निघाले आहेत. घरातून निघाल्यावर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेऊन मग चहाच्या दुकानावर जाणे हा त्यांचा दिनक्रम असे.
भजने, भूपाळ्याची आवड :आईही वेळेबाबत दक्ष होती. तिलाही पहाटे 4 वाजता उठण्याची सवय होती. पहाटे-पहाटेच बरीचशी कामे ती उरकत असे. गहू, बाजरी दळणे असो नाहीतर तांदूळ-डाळ निवडणे असो सर्व कामे ती स्वतः करत असे. काम करताना आपल्या आवडीची भजने किंवा भूपाळ्या ती गुणगुणत असे. नरसी मेहता जी यांचे एक प्रसिद्ध भजन आहे, “जलकमल छांडी जाने बाला, स्वामी अमारो जागशे” हे तिच्या आवडीचे भजन आहे. एक अंगाई गीतही आहे, “शिवाजी नु हालरडु”, आई हे पण बऱ्याच वेळी गुणगुणत असे.
तिला कामात मदत करावी वाटायचे : आम्ही भावा- बहिणींनी आपला अभ्यास सोडून तिला मदत करावी अशी तिची अपेक्षाही नव्हती. आपल्या कामात मदत करायला ती कधी सांगत नसे. आई सतत कामात गुंतलेली बघून आम्हा भावा- बहिणींना स्वतःलाच वाटत असे की तिला कामात मदत करावी. मला तलावात पोहण्याची, तलावात आंघोळ करण्याची फार आवड होती म्हणून घरातले कपडे तलावात धुण्यासाठी मी घेऊन जात असे. कपडेही धुवून होत आणि मला पाण्यात खेळताही येत असे.
इतरांच्या घरची भांडी आणि चरखा :घर चालवण्यासाठी थोडे आणखी पैसे मिळावेत म्हणून आई दुसऱ्यांच्या घरी भांडीही घासत असे. वेळ काढून चरखाही चालवत असे. कारण यातूनही थोडी कमाई होत असे. कापसाच्या बोंडातून कापूस काढणे, कापसापासून धागा तयार करण्याचे काम ही सर्व कामे ती स्वतः करत असे. कापसाच्या बोंडाच्या टरफलाचे काटे आम्हाला टोचतील अशी तिला भीती वाटत असे.
कमीत कमी त्रासासाठी धडपड :आपल्या कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे,आपले काम दुसऱ्याकडून करून घेणे तिला कधीच आवडत नसे. वडनगरमधल्या मातीच्या घरात पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या मला आठवतात. मात्र कमीत कमी त्रास व्हावा यासाठी आईची धडपड असे. म्हणूनच जून महिन्यात कडक उन्हाळ्यात घराचे छप्पर ठीक करण्यासाठी ती छतावर चढत असे. तिच्या परीने ती प्रयत्न तर करत असे मात्र आमचे घर इतके जीर्ण झाले होते की त्याचे छत मुसळधार पाऊस झेलू शकत नव्हते.
जल संरक्षणाचे याहून उदाहरण :पावसाळ्यात आमच्या घरात कधी इथून तर कधी तिथून पाणी गळत असे. घरभर पाणी होऊ नये, भिंतीना ओल लागू नये यासाठी आई जमिनीवर भांडी ठेवत असे, छतावरून पडणारे पाणी त्यात गोळा होत असे. त्या वेळीही मी आईला कधी त्रासलेली पाहिले नाही, स्वतःला दोष देताना पाहिले नाही. याच पाण्याचा वापर पुढचे 2-3 दिवस आई घरातल्या कामांसाठी करत असे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जल संरक्षणाचे याहून उत्तम उदाहरण काय असू शकेल.
घर सुंदर ठेवण्याची खूप आवड :आईला घर सजवण्याची, घर सुंदर ठेवण्याची देखील खूप आवड होती. घर स्वच्छ दिसावे याकरता ती दिवसभर काहीनाकाही करत असे. ती घरातील जमिनी शेणाने सारवत असे. तुम्हाला माहीतच असेल की शेणाच्या गोवऱ्यांना आग लावली तर कधी कधी सुरुवातीला खूप धूर निघतो. आई तर खिडकी नसलेल्या त्या घरात अशा गोवऱ्यांच्या इंधनावरच स्वयंपाक करत असे. धूर बाहेर जायला मार्ग नसल्याने घराच्या भिंती फार लवकर काळपट होत असत. मग दर एक दोन आठवड्यांनी आई नित्यनेमाने भिंती साफ करत असे.
घराच्या दरवाजांवर कलाकुसर :यामुळे घराला नवी झळाळी मिळत असे. आई मातीच्या खूप सुंदर वाट्या बनवून सजवायची. आपल्या भारतीयांमध्ये जुन्या गोष्टींचा पुनर्वापर करण्याची जी सवय आहे, त्यात देखील आई चॅम्पियन आहे. आईची एक अतिशय वेगळी आणि अनोखी गोष्ट माझ्या लक्षात आहे. ती नेहमी जुन्या कागदांना भिजवून, चिंचोक्यांना वाटून एक गोंद बनवत असे. मग या गोंदाचा वापर करून भिंतीवर काचेचे तुकडे चिटकवून खूप सुंदर चित्र तयार करत असे. बाजारातून थोडे बहुत साहित्य आणून ती घराच्या दरवाजांवर कलाकुसर करत असे.
प्रत्येक कामात अचूकतेची सवय : आई एका गोष्टीकडे विशेष लक्ष देत असे, ते म्हणजे अंथरुण अतिशय स्वच्छ आणि टापटीप असावे, त्यावर एक ही धुळीचा कण असलेला तिला खपत नसे. थोड्याशा सुरकुत्या दिसल्या तरी ती पूर्ण चादर झटकून पुन्हा अंथरत असे. आम्ही सुद्धा आईच्या या सवयीचे पालन करत असू. आज इतक्या वर्षांनंतरही आई ज्या घरात राहते आहे, तिथे अंथरुण जरा देखील विस्कटलेले नाही ना याकडे ती बारकाईने लक्ष देते. या वयातही प्रत्येक कामात अचूकतेची तिची सवय कायम आहे.
आजही स्वतःची सर्व कामे स्वतः करते : आता गांधीनगरमध्ये माझ्या भावाचे कुटुंब आहे, माझ्या पुतण्याचे कुटुंब आहे, पण आजही स्वतःची सर्व कामे स्वतः करण्याचा ती प्रयत्न करत असते. स्वच्छतेविषयी माझी आई किती दक्ष आहे, हे मी आजदेखील पाहतो. ज्यावेळी मी दिल्लीवरुन गांधीनगरला जातो, तेव्हा ती मला स्वतःच्या हाताने मिठाई भरवते, आणि ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाला भरवल्यानंतर त्याचे तोंड पुसते, त्याप्रमाणे आई मला मिठाई खाऊ घातल्यानंतर एखाद्या रुमालाने माझे तोंड पुसते. तिच्या साडीत एक रुमाल नेहमी खोचलेलाच असतो.
पशूपक्ष्यांवर दया हा संस्कारांचा भाग : आईच्या स्वच्छतेविषयीच्या प्रेमाचे इतके किस्से आहेत की लिहिण्यात खूप वेळ जाईल. आईमध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. जी व्यक्ती स्वच्छतेचे, साफसफाईचे काम करते तिला देखील आई खूप मान देते. मला आठवतंय, वडनगर मध्ये आमच्या घराजवळील नाल्याची साफसफाई करायला जे येत असत त्यांना आई चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसे. त्यानंतर ते देखील समजून जायचे की काम झाल्यानंतर चहा प्यायचा असेल तर केवळ आमच्याच घरी मिळू शकेल. माझ्या आईची आणखी एक चांगली सवय आहे, जी मला नेहमी स्मरत असते. पशूपक्ष्यांवर दया करणे हा तिच्या संस्कारांचा भाग आहे.
त्या तुपावर वस्तीतील गायींचाही हक्क :उन्हाळ्याच्या दिवसात ती पक्ष्यांकरता मातीच्या भांड्यामध्ये दाणे आणि पाणी जरूर ठेवत असे. आमच्या घराच्या आजूबाजूला राहणारे रस्त्यावरचे कुत्रे उपाशी राहू नयेत, याची सुद्धा आई काळजी घ्यायची. बाबा आपल्या चहाच्या दुकानातून जी मलई आणत असत, त्यातून आई खूप छान तूप बनवत असे, आणि या तुपावर केवळ आमचाच हक्क असायचा, असे मुळीच नव्हते. या तुपावर आमच्या वस्तीतील गायींचाही तितकाच हक्क होता. आई रोज गोमातेला पोळी खाऊ घालायची. पण कोरडी पोळी नाही, त्यावर नेहमी तूप लावलेले असायचे.
जितकी भूक, तितकेच अन्न : जेवणाच्या बाबतीत आईचा नेहमी एक आग्रह असे की अन्नाचा एकही कण वाया जाता कामा नये. आमच्या गावी जेव्हा कोणाच्या लग्न समारंभात पंगतीत जेवण असे तेव्हा जेवताना अन्नाची नासाडी करु नका असे आई सर्वांना लक्षात आणून देत असे. घरात देखील आईने हाच नियम केला होता, जितकी भूक असेल, तितकेच अन्न ताटात घ्यावे याकडे तिचा कटाक्ष असे. आई आज सुद्धा जितके खायचे असेल तितकेच पदार्थ ताटात वाढून घेते. आज देखील ती तिच्या ताटात अन्नाचा एक कण देखील वाया जाऊ देत नाही. नियमानुसार खाणे, ठरलेल्या वेळी खाणे आणि चावून चावून खाणे या सवयी आजही कायम आहेत.
इतरांना आनंदी बघून स्वतः आनंदी :आई नेहमीच इतरांना आनंदी बघून स्वतः आनंदी राहते, घरात जागा भले कमी असेल, पण तिचे मन मोठे आहे. आमच्या घराच्या जवळच एक गाव होते, जिथे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे स्नेही रहात असत. त्यांचा मुलगा होता, अब्बास. वडिलांच्या मित्राच्या अकाली निधनानंतर त्यांनी अब्बासला आमच्या घरीच आणले होते. घरातील इतर मुलांप्रमाणेच आई, अब्बासची देखील खूप काळजी घेत असे. ईद च्या दिवशी आई अब्बासकरता त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. सण उत्सवांच्या काळात जवळपासची काही मुले आमच्या घरी जेवायला येत असत, त्यांना आईच्या हातचे जेवण खूप आवडत असे.
दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख : आमच्या घराच्या परिसरात जेव्हा एखादे साधू महात्मे येत असत, तेव्हा आई त्यांना घरी बोलावून अवश्य खाऊ घालायची. जेव्हा ते निघायचे तेव्हा आई स्वतःकरता नव्हे तर आम्हा मुलांकरता आशीर्वाद मागत असे. ती त्यांना म्हणायची की माझ्या मुलांना असा आशीर्वाद द्या की ते दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख मानतील आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतील. आपल्या मुलांमध्ये भक्ती आणि सेवाभाव जागृत होऊ दे, असा आशीर्वाद ती मागत असे.
तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास :माझ्या आईचा माझ्यावर गाढ विश्वास आहे. तिला तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. मला अनेक दशकांपूर्वीची एक घटना आठवते. त्याकाळात मी संघटनेत असताना लोकसेवेच्या कामात गुंतलो होतो. कुटुंबियांशी अजिबात संपर्क नव्हता. याच काळात, एकदा माझा मोठा भाऊ माझ्या आईला बद्रीनाथ, केदारनाथच्या दर्शनासाठी घेऊन गेला होता. आईचे बद्रीनाथाचे दर्शन झाले तेव्हा केदारनाथमधील लोकांनाही माझी आई येत असल्याची बातमी मिळाली.
लोक तुला ओळखतात : त्यावेळी अचानक हवामान खूप खराब झाले. हे पाहून काही लोक केदारघाटी उतरून खाली जाऊ लागले. ते आपल्यासोबत काही रजया देखील घेऊन गेले. ते रस्त्याने दिसणाऱ्या वयोवृद्ध महिलांना विचारत होते की तुम्ही नरेंद्र मोदींच्या आई आहात का? असेच विचारत विचारत ते आईला भेटले. त्यांनी आईला रजई दिली, चहा दिला, मग तर ते पूर्ण यात्रेच्या कालावधीत आईसोबतच राहिले. केदारनाथला पोहोचल्यावर त्यांनी आईच्या निवासाची चांगली सोय केली. या घटनेचा आईच्या मनावर मोठा परिणाम झाला. तीर्थयात्रेवरून परतल्यावर माझी आई मला भेटली तेव्हा ती म्हणाली, 'तू काही चांगलं काम करत आहेस, लोक तुला ओळखतात'.
तुमच्या ईतकाच मलाही अभिमान : या घटनेला इतकी वर्षे होऊन गेल्यावर जेव्हा लोक आईच्या जवळ जाऊन तिला विचारतात की तुमचा मुलगा पंतप्रधान आहे, याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटत असेल, यावर आईचे उत्तर अतिशय सखोल आहे. आई त्यांना सांगते की जितका तुम्हाला अभिमान वाटतो, तितकाच मलाही वाटतो. तसेही माझे काहीच नाही, मी तर निमित्तमात्र आहे. तो तर देवाचा आहे. तुम्ही हेही पाहिले असेल की, माझी आई कधीही कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत जात नाही. आत्तापर्यंत दोनदाच ती माझ्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात आली आहे.
तिने मला कुमकुम तिलक लावला : एकदा, एकता यात्रेनंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून मी परतलो होतो, तेव्हा अहमदाबादमधील नागरी सन्मान कार्यक्रमात माझी आई व्यासपीठावर आली आणि तिने मला कुमकुम तिलक लावला होता. तो क्षण आईसाठी भावनिक होता कारण एकता दौऱ्यादरम्यान फगवाडा येथे एक हल्ला झाला होता आणि त्यात काही लोक मारले गेले होते. त्या वेळी आईला माझी फार काळजी वाटत होती. तेव्हा मला दोन जणांचा फोन आला होता. एक फोन अक्षरधाम मंदिराचे अध्यक्ष प्रमुख स्वामी जी यांचा होता आणि दुसरा फोन माझ्या आईचा होता. माझी परिस्थिती जाणून घेऊन आईला हायसे वाटले.