मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा माजी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. कोहली 53 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. (Virat Kohli First Half Century in IPL) तो मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी, जेव्हा मोहम्मद शमी आरसीबीच्या डावातील 13 वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा विराट क्रीजवर होता.
शमीच्या चेंडूवर एक धाव घेत विराटनेआपले अर्धशतक पूर्ण केले. प्रदीर्घ कालावधीनंतर फॉर्ममध्ये परतलेला कोहली आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर निश्चिंत दिसला. त्याचवेळी, विरोधी संघ असूनही, मोहम्मद शमीने विराटचे अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि माजी भारतीय कर्णधाराच्या पाठीवर हात ठेवून त्याचे अभिनंदन केले. शमीच्या या खेळाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. शमीच्या या हावभावाचे चाहते कौतुक करत आहेत.