महाराष्ट्र

maharashtra

Padgampora Encounter : जम्मू - काश्मीरमध्ये चकमकीत एक अतिरेकी ठार, एक जवान शहीद

By

Published : Feb 28, 2023, 9:17 AM IST

Updated : Feb 28, 2023, 10:21 AM IST

जम्मू - काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका अतिरेक्याला ठार मारले. या चकमकीत सैन्याचा एक जवान देखील शहीद झाला आहे.

Encounter
चकमक

अवंतीपोरा (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरा येथील पदगामपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला, तर सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. वृत्तानुसार, लष्कर, सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि पोलिसांनी पदगामपोरा गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली तेव्हा ही चकमक झाली.

एक अतिरेकी ठार : परिसरात काही अतिरेकी लपले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे शोध मोहीम सुरू केली. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या अतिरेक्यांनी सैन्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली, असे सूत्रांनी सांगितले. या गोळीबारात लष्कराच्या दोन जवानांना गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, काश्‍मीर पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या चकमकीत एक अतिरेकी मारला गेला आहे. चकमक अजूनही सुरू असून दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

काश्मिरी पंडिताची हत्या : गेल्या रविवारीच अतिरेक्यांनी पुलवामा जिल्ह्यातील अचन गावात खोऱ्यातील एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. चाळीस वर्षीय संजय शर्मा यांची पॉइंट ब्लँक रेंजवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शर्मा हे एका बॅंकेत सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करायचे. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास स्थानिक बाजाराजवळ घडली. तेथील स्थानिक नागरिकांनी शर्मा यांच्या हत्येविरोधात निदर्शने केली. त्यांनी परिसरात सामान्यता आणि शांतता पूर्ववत करण्यासाठी घोषणा दिल्या.

राजकीय पक्षांकडून निषेध : या काश्मिरी पंडितांच्या हत्येचा सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध झाला. आचानचे संजय पंडित यांचे निधन अत्यंत दुःखद असून त्याचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे, असे ट्विट माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटी (JKPCC) ने या घटनेचे वर्णन अतिरेक्यांनी केलेले भ्याड कृत्य असे केले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते अल्ताफ ठाकूर यांनी काश्मिरी पंडित यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) चे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी ही हत्या गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.

दहशतवाद्यांची पुन्हा टार्गेट किलिंग :विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1990 पासून आत्तापर्यंत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 400 हून अधिक काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवल्यानंतर दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग सुरू केली आहे. त्यांचा मुख्य उद्देश हा खोऱ्यात दहशत पसरवून येथील उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांनाही पळवून लावणे हा आहे.

हेही वाचा :Attacks On Kashmiri Pandits : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत काश्मिरी पंडित, 30 वर्षांत तब्बल 400 पंडितांच्या हत्या!

Last Updated : Feb 28, 2023, 10:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details