बेतिया (बिहार) -पूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 13 जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह असताना बिहारमध्ये झालेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी गोपालगंज येथे घडली. बुधवारी 12 जण दगावले होते. तर आज गुरूवारी सकाळी एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवार पश्चिम चंपारण मधून पुन्हा एक घटना समोर आली आहे. येथेही 7 जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे.
गोपालगंजमध्ये 13 जणांचा मृत्यू -
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील मोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशहर आणि मोहम्मदपूर या गावात विषारी दारू पिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण हे गंभीर आहेत त्यामुळे या ठिकाणी मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यातील काही लोकांची डोळ्यांची दृष्टी जाण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अनेक लोकांवर खाजगी आणि मोतिहारी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रशासनाने 5 जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे.