हैदराबाद : दुसऱ्याशी लग्न करण्यास तयार असल्याच्या कारणावरून तरुणीला तिच्या प्रियकराने पळवून नेल्याची घटना हैद्राबादच्या मान्नेगुडा येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी तरुणीच्या घरात घुसून गोंधळ घातला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांवर त्यांनी लाठ्या-चाकूने हल्ला केला. घटनेनंतर तरुणीच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. नातेवाईकांनी अपहरणकर्त्याचे चहाचे दुकान पेटवून दिले. घटनेच्या 6 तासांनंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली असून, या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Man Kidnapped woman on day of her engagement).
काय आहे संपूर्ण प्रकरण : दामोदर रेड्डी आपल्या कुटुंबासह रंगारेड्डी जिल्ह्यातील तुर्कायंजल मान्नेगुडा येथे स्थायिक आहेत. त्यांची 24 वर्षीय मुलगी शहरात बीडीएसचे शिक्षण घेत आहे. 2021 मध्ये ती बंगळुरूमधील बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रात मिस्टर टी कंपनीचे एमडी के. नवीन रेड्डी (29) यांना भेटली. दोघांमधील ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र लग्नाच्या मुद्द्यावरून दोन कुटुंबांमध्ये गैरसमज निर्माण झाले. तेव्हापासून तरुणीने नवीन रेड्डी पासून अंतर ठेवण्यास सुरवात केली. यानंतर नवीनने तिला व्हॉट्सअॅप वरून सातत्याने धमकावणे सुरु केले. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी सप्टेंबरमध्ये आदिभटला पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवीनला अटक केली. मात्र नंतर तो जामिनावर सुटला. त्याने युवतीच्या घराजवळील रिकामा भूखंड भाडेतत्त्वावर घेऊन तेथे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी शेड बांधले. तो तिला त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करू देणार नाही, असे धमकावत असे.
गेल्या वर्षी झाले लग्न ? : या प्रकरणी नवीन रेड्डी म्हणतो, "गेल्या वर्षी 4 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्याच्या वालापार्ला गावातील एका मंदिरात आम्ही हिंदू परंपरेनुसार लग्न केले. तिच्या वडिलांनी मुलीचे बीडीएस पूर्ण होईपर्यंत लग्नाची बाब समोर आणू नये असे सांगितले होते". नवीनने रंगारेड्डी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला की, यावर्षी १ जुलैपासून तिच्या आई-वडिलांनी तिला धमकावून तिचा लग्नाचा विचार बदलवला आहे. ती घटस्फोट न देता दुसऱ्याशी लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे पुरावे दाखवून त्याने कोर्टामार्फत पोलिस आणि तरुणीच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवली आहे.
त्याने महिलेचे अपहरण कसे केले : नवीन रेड्डी याला कळले की, तो ज्या तरुणीवर प्रेम करतो ती शुक्रवारी दुपारी एक वाजता मन्नेगुडा येथील राहत्या घरी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करते आहे. त्यानंतर त्याने वऱ्हाडी आणि नातेवाईक येण्यापूर्वी 5 कार, डीसीएम आणि दुचाकींमधून सुमारे 100 जणांसह तरुणीच्या घरावर हल्ला केला. त्यांनी फर्निचर व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच तरुणीच्या वडिलांना व नातेवाईकांना देखील जबर मारहाण केली. त्यानंतर त्याने आपल्या कारमधून मुलीचे अपहरण करून नेले. हे सर्व सुमारे 40 मिनिटांत घडले.
नातेवाईकांचा पोलिसांवर रोष : या घटनेनंतर तरुणीचे वडील दामोदर रेड्डी व त्यांच्या नातेवाईकांनी सागर रोडवर तळ ठोकला. त्यांनी मन्नेगुडा येथील आरोपीचे चहाचे दुकान पेटवून लावले. आदिभटला पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने सीआयला निलंबित करा, अशा घोषणाणी दिल्या. नवीन रेड्डी याच्या विरोधात तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी त्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. अपहरणाच्या वेळी त्यांनी 100 नंबर वर फोन करूनही तासभर पोलीस आले नाहीत, असा त्यांचा आरोप आहे.