नवी दिल्ली -अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा तणावाचे झाले आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तवांगजवळ ही झटापट झाली आहे.
अनेक जवान जखमी - अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ (Tawang) नुकतीच ही झटापट झाली. भारतीय जवानांनी चीनला (China) चोख प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून (Indian Army) अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.
जवानांना उपचारासाठी गुवाहाटीला आणले : मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेकडो चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच भारतीय जवानांनी त्यांना स्पॉट करून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर झालेल्या झटापटीत सहा भारतीय जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे. अनेक चिनी सैनिकही जखमी झाले आहेत. चकमकीत जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा जास्त आहे. या चकमकीनंतर दोन्ही बाजूंनी तातडीने परिसरातून माघार घेतली.
2020 मध्ये गलवान खोऱ्यात झडप : या आधी 2020 मध्ये 15-16 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात LAC वर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. यामध्ये भारतीय लष्कराच्या एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. चीननेही अधिकृतरित्या या चकमकीत आपले पाच अधिकारी मारले गेल्याचे मान्य केले होते. मात्र ऑस्ट्रेलियन मीडियाच्या दाव्यानुसार हा आकडा 40 पेक्षा अधिक होता.