महाराष्ट्र

maharashtra

One village one Ganesha : एक गाव एक गणपती परंपरेने जपले आदर्श, अनेक गावांचा सामाजिक कार्यात सहभाग

By

Published : Jul 30, 2022, 8:19 AM IST

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश ( Shri Ganesha ). गणपती बाप्पा, या गणपती बाप्पाच्या उत्सवात ( गणपती उत्सव ) महाराष्ट्रातील प्रत्येकजण दंग होऊन जातो. घराघरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना होते. शहरांमध्ये, गावांमध्ये ठिकठिकाणी दहा दिवस गणपती बाप्पा मोरयाचा गजर होत असतो. गणेश मंडळे, त्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गणपती बाप्पा समोरचे देखावे एकच धमाल असते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करायला सुरुवात केली आणि बघता बघता या उत्सवाचे स्वरुप व्यापक झाले. या उत्सवाला सामाजिकतेचे, समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांमध्ये “एक गाव एक गणपती” ( One village one Ganesha ) ही संकल्पना रुढ झाली आहे. गावात सर्वांचा मिळून एकच गणपती बसविला जातो. गणपती उत्सवात गोळा होणाऱ्या वर्गणीतून गावाच्या विकासाची, समाजपयोगी कामे होऊ लागली आहेत.

Ganesh Festival
४९ वर्षांची उर्से गावाची परंपरा

बाप्पाची मनोभावे पूजा -गणेशोत्सवात गणेशभक्त आपल्या प्रिय गणेशाला ( Shri Ganesha ), बाप्पाला अत्यंत मनोभावे घरी आणतात. दहा दिवस त्याची मनोभावे पूजा करतात. घरी मंदिरांमध्ये, मंडळांमध्ये भक्तीभावाने पूजा करतात, दुर्वा वाहतात, नैवेद्य दाखवितात, आरती करतात. सुखकर्ता दुखहर्ता… असे म्हणताना अवघ्या महाराष्ट्रातील वातावरण मंगलमय झालेले असते. त्याच मंगलमय वातावरण काही गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवून या उत्सवाला सामाजिकतेचे अधिष्ठान देण्यात आले आहे. यावर्षीचा गणेशोत्सव जवळ आला आहे आणि गणेश भक्त तयारीला लागले आहेत. यंदाही एक गाव एक गणपतीची ( One village one Ganesha ) परंपरा शेकडो गावांमध्ये सुरू राहणार आहे.

एक गाव एक गणपती –अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती ( One village one Ganesha ) संकल्पना राबविली जात आहे. संपूर्ण गावात सर्वांचा मिळून एकच गणपती स्थापन केला जातो. गावात दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाते. अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवात जमा झालेल्या वर्गणीमधून गावाच्या विकासासाठी काही कामे केली जातात. अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा आता रुढ होऊ लागली आहे.

कोईलची ७०० वर्षांची प्राचीन परंपरा - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कोईल गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ परंपरा आहे. विशेष म्हणजे ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. साडे सहाशे-सातशे वर्षांची प्राचीन अशी परंपरा असल्याचे वाडवडील सांगतात. गावातल्या प्रत्येकाच्या घरी गणपती मूर्तीची स्थापना केली जाते, परंतु गावात मात्र सर्वांचा मिळून एकच गणराय असतो. गावाचे ग्रामदैवत गणपती हेच आहे. गावामध्ये गणपती मंदिर असून मंदिरातील मूर्ती काळ्या दगडाची आहे. याच मूर्तीभोवती गणेशोत्सवात आरास केली जाते. सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी करतात, अशी प्रथा आहे.

कोईल गावात ७०० वर्षांची प्राचीन परंपरा

४९ वर्षांची उर्से गावाची परंपरा – पालघरमधील डहाणू तालुक्यातील उर्से गावात गेल्या ४९ वर्षांपासून “एक गाव एक गणपती” उपक्रम राबविला जात आहे. यंदा या उपक्रमाचे ५० वे वर्ष असणार आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या ‘उर्सें’ गावाने ‘एक गाव एक गणपती’ ( One village one Ganesha ) उत्सव साजरा करीत सर्वप्रथम सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. एक-दोन नव्हे सलग ४९ वर्षांपासून उर्से गावात एक गाव एक गणपती ही परंपरा निर्माण झाली आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासह असे सर्वच सण भक्तिभावाने एकत्रितरित्या साजरे करतात. सुमारे अडीच-तीन हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावाचा आदर्श पुढे अन्य गावांनीही घेण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या काळात गावात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

शेतकऱ्यांना मदत –उर्से गावाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असे की, गणपती विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. श्री गणेशावरील आपली भक्ती दाखवित ग्रामस्थ सर्व वस्तू चढ्या दराने अतिशय आनंदाने खरेदी करतात. यातून उरलेले पैसे गरजू शेतकऱ्यांना व्याजाने दिले जातात. पुढच्या वर्षी याच पैशातून सण केले जातात.

आपटी गावाला चार दशकाहून मोठी परंपरा – विक्रमगड शहरामधील आपटी या गावाने एक गाव एक गणपती परंपरा गेल्या ४६ वर्षांपासून जोपासली आहे. सामाजिक एकतेचे दर्शन घडावे या लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सव सुरू करण्यामागील उद्देशाचे तंतोतंत पालन गावात केले जाते. १९७० च्या सुमारास सर्वप्रथम गावात एक गाव एक गणपती संकल्पना गावातील थोरामोठ्यांनी, तरुणांनी राबविली. आजतागायत ही परंपरा सुरू आहे. झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद या गावांनीही आपटीचा आदर्श घेत पुढे एक गाव एक गणपती परंपरा सुरू केली. आपटी बुद्रुकच्या नवतरुण मित्रमंडळाने राबविलेला हा उपक्रम गावाची एकजूट दाखवून देतो.

आपटी गावाला चार दशकाहून मोठी परंपरा

कोरोनामुळे गाव एकत्र आले – गेली दोन वर्षे कोरोना महामारीने अवघ्या जगाला संकटात टाकले होते. मोठी मनुष्यहानी केलेल्या या कोरोनामुळे माणसे मात्र जवळ आली. एकमेकांच्या मदतीला धावली. याच संकटाच्या काळात मोठ्या उत्सवाच्या खर्चांवर आपसूक बंधने आली. विनाकारण होणाऱ्या खर्चावर आळा बसू लागला. याच काळात मोठ्या प्रमाणात एक गाव एक गणपती संकल्पना रुजली. अनेक गावांनी गावात उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना एकत्र आणून एक गाव एक गणपती संकल्पनेला बळ दिले.

आग्रोळीची ६० वर्षांपेक्षा मोठी परंपरा –नवी मुंबईतील आग्रोळी गाव एक गाव एक गणपती परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. ६२ वर्षांपासून इथे ही परंपरा आदर्श ठरली आहे. कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ही गोष्ट साकारली. बेलापूरच्या आग्रोळी गावाने लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव प्रत्यक्षात साकारला आहे. अवघ्या १५० उंबऱ्यांचं हे गाव सर्वांसाठी एक गाव एक गणपती परंपरेसाठी सर्वांसमोर आदर्श निर्माण करीत आहे. १९६१ मध्ये गावात प्लेगच्या साथीने भीषण रुप धारण केले होते. भातशेतीच्या उत्पन्नावर गुजराण करणारे गाव संकटात होते. अशात गणपती उत्सवात प्रत्येकाने गणपती कसा स्थापन करायचा असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. ग्रामस्थांसमोरचे संकट हेरून भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांना समजावून एक गाव एक गणपती कल्पना मांडली, गावकऱ्यांना समजावली. तेव्हापासून आजजागायत येथे ही परंपरा सुरू आहे.

दक्षिण महाराष्ट्रात ८०० हून अधिक गावात परंपरा –कोरोना आणि महापुराच्या संकटाने सांगली, सातारा, कोल्हापूरला मागील दोन वर्षे मोठ्या संकटात टाकले होते. या पार्श्वभूमीवर शेकडो गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना मूर्त स्वरुपात आणली. उत्सवात होणाऱ्या खर्चाला आळा घालून जमणारा पैसा गावातील विधायक कामांसाठी वापरला जाऊ लागला. कोरोनाच्या संकटाच्या काळात रुग्णांच्या मदतीसाठी गणेशोत्सवात जमा होणाऱ्या वर्गणीतील निधीचा सदुपयोग केला गेला. गेल्यावर्षी दक्षिण महाराष्ट्रात ७५० हून अधिक गावे एक गाव एक गणपती संकल्पनेत कार्यरत झाली. त्यात सातारा जिल्ह्यात सव्वाचारशे गावांमध्ये तर कोल्हापुरात जवळपास तीनशे गावात ही संकल्पना अस्तित्वात आली. जमलेल्या पैशांचा उपयोग कोरोना रुग्णांना मदत, कोविड सेंटरला मदत यासाठी केला गेला.

हेही वाचा -India Beat West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, रोहित शर्माची धमाकेदार खेळी

ABOUT THE AUTHOR

...view details