महाराष्ट्र

maharashtra

गुपकर आघाडी : जम्मू काश्मीरच्या स्थानिक पक्षांमध्ये वाढती एकी..

जम्मू काश्मीरमधील विविध पक्षांनी एकत्र येत गुपकर आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी प्रामुख्याने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णय़ाविरोधात लढत आहे. एकेकाळी भाजपच्या सोबत असणारे एकमेकांचे दोन कट्टर विरोधी पक्ष आता भाजपविरोधात एकत्र आले आहेत, ते पाहता आता भाजप पुढे कोणती चाल चालेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासंदर्भात लिहित आहेत ईटीव्ही भारतचे वृत्तसंपादक बिलाल भट...

By

Published : Nov 19, 2020, 3:37 PM IST

Published : Nov 19, 2020, 3:37 PM IST

Gupkar Alliance: The diminishing fault lines of regional parties in J&K
गुपकर आघाडी : जम्मू काश्मीरच्या स्थानिक पक्षांमध्ये वाढती एकी..

भाजप ज्याला 'गुपकर गँग' म्हणते, तो काश्मीरमधील काही स्थानिक पक्षांचा एकत्रित आलेला समूह आहे. ही आघाडी प्रामुख्याने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णय़ाविरोधात लढत आहे. एक लक्ष्य असल्यामुळे, आपापसातील इतर मतभेद विसरुन या आघाडीमध्ये जवळपास सर्व स्थानिक पक्ष एकत्र आले आहेत.

गुपकर आघाडीमधील काही प्रमुख पक्षांनी यापूर्वी भाजपसोबत युती केली आहे. मात्र तेव्हा काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला नव्हता. फारुख अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष वाजपेयी काळात एनडीएमध्ये होता. तर, मोदींच्या काळात महबूबा मुफ्तींचा पीडीपी पक्ष एनडीमध्ये सहभागी झाला होता. या दोन्ही पक्षांनी एकमेकांना हरवण्यासाठी भाजपची मदत घेतली, आणि भाजपने या दोन्ही पक्षांच्या मदतीने काश्मीरमध्ये आपले हातपाय पसरले. त्यामुळे आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपापसातील मतभेद मिटवून हे दोन्ही पक्ष भाजपविरोधात एकत्रितपणे उभे आहेत.

जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवत कलम ३७० हटवल्यानंतर भाजपसाठी काश्मीरमध्ये सर्व काही ठीकठाक होते. केंद्राचे आदेश मानत, त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांवर काम करणारे मनोज सिन्हा हे या प्रांताचे राज्यपाल झाले. उमर आणि फारुख अब्दुल्लांच्या सुटकेनंतर इथल्या लोकांची सर्वात मोठी मागणी फोर-जी इंटरनेट सुरू करणे ही होती. त्याव्यतिरिक्त सामन्यांच्या आयुष्यात जास्त काही बदल झाला नाही.

कित्येक महिने नजरकैदेत राहिलेल्या महबूबा मुफ्ती जेव्हा बाहेर आल्या, तेव्हा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी ठिणगी पेटली. जम्मू काश्मीरचे कलम ३७० जोपर्यंत पूर्ववत लागू केले जात नाही, तोपर्यंत आपण ना निवडणूक लढू, ना दुसऱ्या कोणत्या (तिरंगा) झेंड्याला सलाम ठोकू, असे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे भाजपला काश्मीरमध्ये आपला विस्तार वाढवण्यास चांगली संधी असल्याचा समज (किंवा गैरसमज) झाला. मुख्य नेत्यांना कित्येक महिने डांबून ठेवल्यानंतर, येथील पक्ष आता स्थानिक निवडणुकांपासून दूर राहतील असा समज भाजपने करुन घेतला.

मात्र, भाजपला अनपेक्षित असा निर्णय गुपकर आघाडीने घोषित केला. तो म्हणजे भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा. आतापर्यंत काश्मीरच्या स्थानिक लोकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केलेल्या गुपकर आघाडीने असे पाऊल उचलल्याने भाजप नक्कीच क्रोधित झाले.

भाजप सध्या गुपकर आघाडी ही कशी देशविरोधी आहे याचा प्रचार करत आहे. भाजपसमोर आधीच नांगी टाकत काँग्रेसने गुपकर आघाडीमधून काढता पाय घेतला आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पक्ष ज्याप्रकारे आपले मतभेद विसरुन भाजपविरोधात एकत्र आले आहेत, ते पाहता आता भाजप पुढे कोणती चाल चालेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :तेलुगु लेखक वरावरा राव यांना नानावटी रुग्णालयात हलवले

ABOUT THE AUTHOR

...view details