नवी दिल्ली G२० Delhi Pollution :राजधानीनवीदिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला जी २० परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेसाठी जगभरातील प्रमुख देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीची गणना जगातील सर्वात प्रदुषित शहरांमध्ये होते. येथील हवेचा स्तर कायमच धोक्याच्या वर असतो. मात्र जी २० परिषदेदरम्यान असं काही झालं, ज्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी अचानक कमी झाली.
यामुळे घसरला प्रदूषणाचा स्तर : झालं असं की, जी२० परिषदेमुळे दिल्लीत ८ ते १० सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. या दरम्यान दिल्लीतील सर्व शाळा, कॉलेजेस आणि सरकारी ऑफिस बंद आहेत. त्यामुळे दिल्लीतील रस्त्यांवरील वाहनांची संख्या अचानक कमी झाली. या सोबतच या दरम्यान राजधानीत मुसळधार पाऊसही झाला. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर बऱ्यापैकी घसरला आहे. दिल्लीतील हवा तब्बल ११ महिन्यांनंतर प्रदूषणमुक्त झाली आहे.
बऱ्याच ठिकाणी AQI ५० च्या खाली : जी २० परिषदेच्या या दोन दिवसांत राजधानीत बर्याच ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५० च्या खाली आला. जर आपण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) वेबसाइटवर पाहिलं तर, बुरारी क्रॉसिंग वगळता दिल्लीच्या सर्व मेट्रो स्थानकांवर रविवारी सकाळी एकूआय १०० च्या खाली होता. प्रदूषणाची ही स्थिती समाधानकारक मानली जाते. दिल्लीतील बहुतेक स्थानकांचा यूआय ५० च्या खाली होता. म्हणजे हवा प्रदूषणमुक्त झाली आहे. डीटीयू दिल्लीचा एक्यूआय ३०, आयटीओचा ४६, मंदिर मार्गाचा ३२, आरके पुरमचा ३९, लोधी रोडचा ३७ आणि आयजीआय विमानतळाचा एक्यूआय ४६ होता.
राजधानीतील वातावरण सुसह्य झालं : दिल्लीतील हवा प्रदूषणमुक्त झाल्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर बीके सक्सेना यांनी 'X' वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला. जी २० च्या सन्माननीय पाहुण्यांचा मुक्काम आनंददायी व्हावा यासाठी दिल्लीला भगवान इंद्राचा आशीर्वाद मिळाला, असं गव्हर्नर सक्सेना म्हणाले. दिल्लीत अधूनमधून पडणाऱ्या हलक्या पावसामुळे तापमान आणि एक्यूआय दोन्हीची पातळी घसरली आहे. यामुळे दिल्ली स्वच्छ, सुसज्ज आणि सुसह्य झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
- Rishi Sunak Akshata Murthy : ब्रिटनचे पंतप्रधान रंगले भक्ती रंगात, सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट; पाहा Photos
- G२० Summit : जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा अजेंडा, जाणून घ्या सविस्तर