महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 11, 2020, 10:03 AM IST

Updated : Dec 11, 2020, 6:57 PM IST

ETV Bharat / bharat

LIVE : दिल्ली चलो आंदोलनाचा १६वा दिवस; सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल..

Farmers Delhi Chalo protest against Centers Farm Acts see LIVE Updates of 16th day
LIVE : दिल्ली चलो आंदोलनाचा १६वा दिवस; सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल..

18:56 December 11

कृषी कायद्याविरोध शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालयात

शेतकरी आंदोनलावर अद्याप तोडगा निघाला नाही. अशात आता भारतीय किसान युनियनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिन्ही केंद्रीय कृषी कायद्यांना संघटनेने आव्हान दिले आहे. केंद्राच्या कायद्यांमुळे शेतकरी उद्योगपतींच्या हव्यासाचे बळी पडतील, असे याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, सरकार शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले आहेत. मात्र, चर्चा नको तर कायदे रद्द करा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन सोडून चर्चा करण्याचे आवाहन कृषी मंत्र्यांनी दिले आहे. 

16:02 December 11

दिल्लीच्या दिशेने शेतकरी आंदोलकांचे विविध भागांतून सातशे ट्रॅक्टर येत आहेत.   

14:21 December 11

शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार; त्यांच्याकडून प्रस्ताव येणे बाकी..

शेतकऱ्यांनी आम्ही दिलेला प्रस्ताव फेटाळल्याची माहिती आम्हाला माध्यमातूनच कळाली. त्यांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. आम्ही केवळ त्यांचा प्रस्ताव येण्याची वाट पाहत आहोत, असे केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी स्पष्ट केले.

12:32 December 11

हरयाणातील भाजपा सरकार अडचणीत?, दुष्यंत चौटालांचा राजीनाम्याचा इशारा

हरयाणातील भाजपा सरकार अडचणीत?, दुष्यंत चौटालांचा राजीनाम्याचा इशारा

शेतकरी कायद्याचा देशभर विरोध होत असताना राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारचा विरोध होत आहे. त्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या जननायक जनता पार्टीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. 

10:33 December 11

आमदार देवेंद्र भुयारांसह शेकडो शेतकऱ्यांची दिल्लीत धडक

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या वरुड-मोर्शी मतदान संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार आपल्या शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. बुधवारी वरुड-मोर्शी तालुक्यातील शेतकरी आणि आमदार तामिळनाडू एक्सप्रेसने दिल्लीला गेले. आता ते दिल्लीत पोहचले असून तेथील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

10:31 December 11

हरियाणा सरकारला नमवून बच्चु कडू यांचा ताफा दिल्ली बॉर्डरवर दाखल..

राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे जात आहेत. त्या दरम्यान बुधवारी त्यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरला होता. त्यानंतर परवानगी मिळवून पलवलकडे निघालेले बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा गुरुवारी राजस्थान व हरियाणा सीमेवर सुनैडा येथे अडविण्यात आला. मात्र कुठल्याही परिस्थितीत नवी दिल्ली गाठण्याचा निर्धार व्यक्त करत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह तिथेच ठिय्या आंदोलन केले. शेवटी हरियाणा सरकार नरमले, आणि बच्चू कडू यांच्यासह काही दुचाकींस्वार आंदोलकांना जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर कडू हे कार्यकर्त्यांसह पलवल बॉर्डरवर दाखल झाले आहेत.

10:29 December 11

किसान मजदूर संघर्ष समितीचे सदस्य दिल्लीला रवाना..

किसान मजदूर संघर्ष समितीचे सदस्य दिल्लीला रवाना..

किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये असणारे शेकडो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अमृतसरहून सुमारे ७०० ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज दिल्लीच्या दिशेने चालल्या असल्याची माहिती एस. एस. पांधेर यांनी दिली.

09:55 December 11

सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल..

सिंघू सीमेवर आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २९ नोव्हेंबरपासून हे शेतकरी सिंघू आणि दिल्लीच्या इतर सीमेवर आंदोलन करत आहेत. याठिकाणी तैनात करण्यात आलेले दोन आयपीएस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

09:44 December 11

LIVE : दिल्ली चलो आंदोलनाचा १६वा दिवस

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा मध्य प्रदेश अशा राज्यांमधील शेतकरीही मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.

चर्चेच्या फेऱ्या अयशस्वी..

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. तसेच, कायद्यामध्ये काही सुधारणा केलेला केंद्र सरकारचा प्रस्तावही शेतकरी संघटनांनी फेटाळून लावत आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यानंतर गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व्यवस्था कायम राहणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी ) बंद होणार नाही. शेतकरी संघटनांनी आम्ही पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा करावी आणि चर्चेसाठी आम्हाला सुचीत करावे. सरकार चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत, असे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा..

गुरुवारी सिंघू सीमेवरून पत्रकार परिषद घेत शेतकरी नेत्यांनी भविष्यात घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती दिली. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर रेल्वे रुळावर आम्ही कब्जा करू. याची तारीखही आम्ही लवकरच ठरवू असे, शेतकरी नेते पत्रकार परिषदेत म्हणाले. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती उत्तर विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले.

Last Updated : Dec 11, 2020, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details