महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लाल किल्ला ताब्यात घेण्याची तयारी नोव्हेंबरपासूनच सुरू होती - लाल किल्ला

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर तोडफोड केली. यानंतर देशातील वातावरण तापले होते. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या हिंसाचाराची तयारी नोव्हेंबरमध्येच करण्यात आली होती, असा खुलासा आरोपपत्रातून झाला.

लाल किल्ला
लाल किल्ला

By

Published : May 27, 2021, 5:58 PM IST

नवी दिल्ली - केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. यावेळी काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर हिंसाचार केला होता. याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचार करण्याचा कट नोव्हेंबरमध्ये रचण्यात आला होता. नोव्हेंबरपासूनच लाल किल्ल्यावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू होती. सरकारची बदनामी व्हावी, या हेतूने हिंसाचारासाठी प्रजासत्ताक दिन निवडण्यात आला. दिल्ली गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हा खुलासा झाला आहे.

दिल्ली पोलिसांनी नुकतेचं लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबद्दल आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. नोव्हेंबर 2020 पासूनच लाल किल्ल्यावर हिंसाचार करण्याची तयारी सुरू होती. यासाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी करण्यात आले. लाल किल्ला ताब्यात घ्यायचा होता. जेणेकरून सीमेवर नाही. तर लाल किल्ल्यावर बसून आंदोलन करता येईल. परंतु तेथे ज्या प्रकारे हिंसाचार झाला आणि किल्ल्यावर निशान साहिब ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर ते घाबरून पळून गेले, असे आरोपपत्रात दिल्ली गुन्हे शाखेने म्हटलं आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेने न्यायालयात तीन हजाराहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. अटक केलेल्या अनेक आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. या हिंसाचारात 500 हून अधिक पोलीस जखमी झाले. त्याच वेळी, दीडशेहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली. काही शेतकरी नेते फरार आहेत, ज्यांचा शोध सुरु आहे.

लाल किल्ल्याचा मिळवला होता ताबा -

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर रॅली सुरू होती. यातच काही आंदोलकांनी लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब हा धार्मिक ध्वज फडकावला. लाल किल्ल्यावर ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी तेथे तोडफोड केली. तसेच पोलिसांवरही हल्ला केला. किल्ल्याच्या परिसरात ट्रॅक्टर फिरवत धुडगूस घातला होता. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना हिंसाचार केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तर अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. आता तब्बल चार महिन्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा भाजपावर आरोप -

शेतकरी लाल किल्ल्याकडे वळाले. याला दीप सिद्धू जबाबदार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. तसेच दीप सिद्धू हा भाजपाचा एंजट असून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी त्याने शेतकऱ्यांना भडकावून लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दीप सिद्धू आणि अभिनेता आणि खासदार सनी देओल यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. कृषी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी शेतकऱ्यांविरोधात भाजपाने हा कट रचल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details