रायपूर (छत्तीसगड) : ज्या दिवशी प्रियंका गांधी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रायपूरला आल्या होत्या, त्या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुलांची उधळण करण्यात आली होती. ती फुले आता गुलाल बनवण्यासाठी पाठवण्यात आली आहेत. त्यावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपने हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप : प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी रायपूरच्या रस्त्यांवर सुमारे 6 हजार किलो फुलांची उधळण करण्यात आली होती. ती फुले आता रायपूर जिल्हा पंचायतीच्या मल्टी युटिलिटी डोममध्ये पाठवण्यात आली आहेत. तेथे त्यापासून गुलाल बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र या फुलांपासून गुलाल बनवण्यास भाजपने विरोध केला आहे. भाजपचे माजी मंत्री आणि नेते राजेश मुनत यांनी या प्रकरणी निषेध नोंदवत आपला आक्षेप नोंदवला आहे. हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राजेश मुनत? :राजेश मुनत म्हणाले की, 'काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी करोडो रुपये खर्च करून रस्त्यावर गुलाबाची फुले उधळण्यात आली. लोकांनी त्या फुलांना पायदळी तुडवले आणि त्यांच्यावरून वाहनेही गेली. मी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना विचारू इच्छितो की, तुम्हाला सनातन संस्कृतीही माहीत आहे का? पायदळी तुडवलेल्या गुलाबाच्या फुलांचा गुलाल करून आपण आपल्या देवी - देवतांना तो लावू शकतो का? जेव्हा आपण होलिकाची पूजा करतो त्यावेळी सर्वप्रथम आपण गुलाल वापरतो. मात्र जो गुलाब पायांनी तुडवला गेला आहे त्याचा गुलाल बनवून देवतांना अर्पण करणे म्हणजे सनातन धर्माचा अपमान नाही काय? मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचा विचार करून सनातन धर्माचा अपमान करणे थांबवावे'.