नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला दोन महिने होत आले असले तरी अद्याप तोडगा निघाला नाही. शेतकरी संघटनांचे नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या असून दहावी फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. आज (मंगळवार) विज्ञान भवन येथे बैठक होणार होती. मात्र, बैठक उद्या (बुधवार) होणार आहे. याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती दिली.
नियोजित वेळापत्रकानुसार आज मंगळवारी बैठक होणार होती. मात्र, आता उद्या दुपारी दोन वाजता विज्ञान भवन येथे बैठक होणार आहे. याआधी १५ जानेवारीला शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चा झाली होती. मात्र, यातून काहीही तोडगा निघाला नव्हता. शेतकऱ्यांनी औपचारिक गट तयार करून मागण्यांचा प्रस्ताव सरकारला सादर करावा, अशी सुचना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे.