लखनौ :उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील न्यायालयात कुख्यात संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाच्या आवारात झाला खून :जिल्हा न्यायालयाच्या आवारात 7 जून रोजी संजीव माहेश्वरी ऊर्फ जीवाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून करण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळली आहे. यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एसआयटीला तपास लवकर पूर्ण करण्याचे आदेश :उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने संजीव माहेश्वरी ऊर्फ जीवा हत्याकांडप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीला तपास लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक वकील मोतीलाल यादव यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती जसप्रीत सिंग यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या घटनेची सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
एसआयटी स्थापन होऊन झाले सहा दिवस :एसआयटी स्थापन होऊन केवळ सहा दिवस झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सध्या असा कोणताही आदेश देता येणार नसल्याचे न्यायालयाने यावेळी बजावले. तपासात काही कमतरता असल्यास याचिकाकर्ता भविष्यात नवीन याचिका दाखल करण्यास मोकळा असल्याचेही याचिका निकाली काढताना न्यायालयाने सांगितले. त्यामुळे याचिकाकर्ता नवीन याचिका भविष्यात दाखल करू शकतो.
हेही वाचा -
- Gaming App Conversion Case : गेमींग अॅपद्वारे धर्मांतर करणाऱ्या शाहनवाजला पोलिसांनी नेले गाझियाबादला, दुबई कनेक्शनमुळे आयबी सतर्क