नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत, गेल्या आठ वर्षांत निवडक राजकारणी आणि व्यावसायिक व्यक्तींच्या हातात सत्ता एकवटली असून त्यामुळे भारताची लोकशाही आणि संस्था कमकुवत होत आहेत असा थेट घणाघात केला आहे. निवडणूक फायद्यासाठी मतदारांचे ध्रुवीकरण करत घटनात्मक मूल्ये आणि तत्त्वांवर आघात केला जात असून सामाजिक सलोखा जाणीवपूर्वक मोडीत काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
काँग्रेस प्रमुखांनी 'हिंदुस्तान टाईम्स'मधील लेखात लिहिले आहे की, पूर्वीच्या स्वतंत्र संस्था आता 'कार्यकारी साधने' बनल्या आहेत, ज्या पक्षपाती पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील देणग्या आणि उद्योगपतींच्या संगनमताने कमावलेल्या पैशाच्या जोरावर निवडणुकीचे निकाल विकृत केले जात आहेत, असही त्या म्हणाल्या आहेत. सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागे सरकारी यंत्रणा जातात. कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेसची महत्त्वाकांक्षी 'भारत जोडो यात्रा' काढली जात असताना सोनिया गांधी यांचा लेख आला आहे. देशातील कथित विभाजनाचा मुकाबला करणे आणि पक्ष संघटनेला नवसंजीवनी देणे हा यात्रेचा उद्देश आहे असही त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे.