महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या प्रचार सभेत भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

By

Published : Jun 16, 2021, 12:21 PM IST

मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती

कोलकाता -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा एका सभेत त्यांनी स्वतःचा उल्लेख कोब्रा असा केला होता. त्यावरून ते आता अडचणीत आले आहेत. याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांची आज कोलकाता पोलिसांनी चौकशी केली. मिथुन चक्रवती यांच्या भाषणाने मतदानानंतरच्या हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाल्याचे पोलिसांनी म्हटलं.

कोलकाता पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती तीर्थंकर घोष यांनी याचिकाकर्ता वकिलांच्या विनंतीवरून पुढील सुनावणी 18 जूनपर्यंत तहकूब केली.

मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला आहे, की चित्रपटांमधील ते संवाद केवळ विनोदासाठी बोलले गेले होते. कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटलं. कोलकाताच्या माणिकटला पोलीस स्टेशनमध्ये मिथुनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रचार सभेतील त्यांच्या संवादांमुळे राज्यात मतदानोत्तर हिंसाचार भडकला, असे तक्रारीत म्हटलं आहे.

काय म्हटले होते मिथुन चक्रवर्ती?

'मी कोब्रा आहे. मी इतर दुसऱ्या प्रजातीचा साप नाही. मी एका चावा घेताच समोरच्याचं काम तमाम करून टाकेन', तर 'मी तुला येथे मारले तर तुझे शरीर स्मशानभूमीत जाईल', अशी वक्तव्ये त्यांनी केले होते. 7 मार्चला आयोजित एका रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केले होते.

भाजपात प्रवेश -

2011 मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमत नसल्याचं दिसत होतं. शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details