महाराष्ट्र

maharashtra

सैनिकांना गलवान येथे विनाशस्त्र पाठवले, याला जबाबदार कोण?; राहुल गांधींचा सवाल

By

Published : Jun 18, 2020, 1:46 PM IST

चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांना मारण्याचे धाडस कसे केले? भारतीय सैनिकांना मारून चीनने अपराध केला आहे. सैनिकांना विनाशस्त्र गलवान येथे पाठवण्यात आले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे सरकारला विचारला आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमध्ये भारतीय जवान हुतात्मा झाल्याप्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी (दि. 15 जून) रात्री व मंगळवारी (दि. 16 जून) भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. विनाशस्त्र असणाऱ्या सैनिकांना गलवान खोऱ्यात कोणी पाठवले? याला जबाबदार कोण?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांना मारण्याचे धाडस कसे केले? भारतीय सैनिकांना मारून चीनने अपराध केला आहे. या सैनिकांना विनाशस्त्र गलवान येथे पाठवण्यात आले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे सरकारला विचारला आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी राहुल गांधी यांनी धारेवर धरले होते. पंतप्रधान मोदी गप्प का..? लपत का आहात..? बास.. आता खूप झाल! देशात जनतेला उत्तर द्या, नेमक काय झालं लडाखच्या सीमेवर?, चीनने आपल्या भारतीय सैन्यातील जवानांना मारलेच कसे? चीनची हिंमतच कशी होते, भारतीय सीमेत घुसखोरी करुन कब्जा करण्याची?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करुन विचारले आहेत.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चीनचा उल्लेख केला नाही. यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. तुमच्या ट्विटमध्ये चीनचा उल्लेख न करता तुम्ही भारतीय सैन्याचा अपमान का करत आहात? जवान हुतात्मा झालेले असताना तुमच्या रॅली का सुरू आहेत? क्रोनी मीडिया सत्य लपवत सैन्याला कारणीभूत का ठरवत आहे? विकत घेतलेला मीडिया भारत सरकारऐवजी सैन्यावर का ठपका ठेवत आहे? अशी टीका राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांच्यावर बुधवारी केली होती.

ही घटना अत्यंत दुःखद व त्रासदायक आहे. सैनिकांनी आपले कर्तव्य धैर्याने पार पाडले आणि हुतात्मा झाले. या कठीण काळात देशातील नागरिक खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आम्हाला भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अभिमान आहे', असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले होते.

राजनाथ सिंह यांनी रविवार आणि सोमवारी भाजपच्या जनसंवाद रॅलीमध्ये जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड येथील कार्यकर्त्यांना संबोधित केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details