नवी दिल्ली - देशात चाललेल्या अशांततेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यासाठी आपण सर्वांनी बैठक घेऊन सरकारविरोधी आंदोलनाची योजना आखायला हवी, असेही ममता यांनी म्हटले आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र - ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र
देशात चाललेल्या अशांततेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
![लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र Mamata Banerjee writes to NCP chief Sharad Pawar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5470542-thumbnail-3x2-oaoa.jpg)
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलने सुरु आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. वेगवेगळ्या मुद्यावरुन देशात सध्या अशांततेचे वातावरण असल्याने सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.
ममता बनर्जी यांनी शरद पवारांना पत्र लिहिल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांच्या साथीने ममता बॅनर्जी भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सध्या झारखंडमध्येही भाजपविरोधी निकाल लागला आहे. त्यामुळे देशात काही ठिकाणी भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. याचाच फायदा उचलण्यासाठी ममता बॅनर्जी भाजपविरोधी गट तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत.