कुर्नूल - आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील कोडूमूर गावात एक विचित्र परंपरा आहे. येथील व्यंकटेश्वर मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी चक्क जिवंत विंचू अर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच, जिवंत विंचूंनी देवाला सुशोभितही केले जाते. गावातील डोंगरावर हे मंदिर आहे. ही परंपरा अनेक दशकांपासून चालत आली आहे.
अगदी जोरदार डंख मारणारे विंचू या दिवशी शांत असतात. या दिवशी ते भाविकांना काहीही नुकसान पोहोचवत नाहीत. 'चुकून एखाद्या विंचवाने त्या दिवशी कुणाला दंश केलाच तर, त्या दंशाच्या वेदना फार काळ राहत नाहीत. मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर या वेदना निघून जातात,' असे येथे येणारे भाविक सांगतात.