महाराष्ट्र

maharashtra

एल्गार परिषद : वरवरा राव यांच्या जामीनासाठी पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव

By

Published : Oct 15, 2020, 9:20 PM IST

तेलगु कवी वरवरा राव हे कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषद आयोजन प्रकरणी तुरुंगात आहेत. ८१ वर्षीय राव यांना वैद्यकीय कारणामुळे काही दिवस जामीन मिळावा. तसेच त्यांना हैदराबादला कुटुंबीयांकडे जाण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - तेलगु कवी वरवरा राव हे कोरेगाव-भीमा दंगल आणि एल्गार परिषद आयोजनाप्रकरणी तुरुंगात आहेत. राव यांच्या जामीनासाठी त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तुरुंगात राव यांना अमानवी आणि क्रूर वागणूक देण्यात येत असून आरोग्याच्या कारणावरून त्यांना जामीन मिळावा, असे याचिकेत म्हटले आहे.

राव यांच्या पत्नी हेमलता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. '८१ वर्षीय राव यांना वैद्यकीय कारणामुळे काही दिवस जामीन मिळावा. तसेच त्यांना हैदराबादला कुटुंबीयांकडे जाण्याची परवानगी मिळावी. तुरुंगात असताना त्यांचे १८ किलो वजन कमी झाले असून आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा ते सामना करत आहेत', असे याचिकेत म्हटले आहे.

वरवरा राव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. राव यांच्या आरोग्याबाबत तुरुंग प्रशासन कोणतीही माहिती देत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यावेळीही त्यांच्या कुटुंबीयांनी जामीनासाठी अर्ज केला होता. वरवरा राव ज्या प्रकरणात अटकेत आहेत त्याचे स्वरुप पाहिल्यास आरोग्याविषयक अडचणींमुळे जामीन देऊ नये, असे एनआयएने म्हटले होते.

पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगलीत नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे पोलीसांनी तपासात म्हटले आहे. परिषदेच्या आयोजनात सहभाग असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील काहींची जामीनावर सुटका झाली. मात्र, राव अद्यापही तुरुंगात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details