लखनऊ (उ.प्र)- मजलीस-ए-उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना कलबे जव्वाद यांनी मोहरमच्या विधीसंबंधी काही मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने शिया समुदायातील नागरिकांना काही अटींसह घरात ताझिया ठेवणे तसेच अझादारी पाळण्याची परवानगी दिली आहे.
कोरोना काळात खबरदारी म्हणून राज्य सरकारने मोहरमच्या विधींवर निर्बंध घातले होते. या विरोधात जव्वाद यांनी शनिवारी आंदोलन केले होते. त्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास सरकारने काही अटींसह मोहरम साजरा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, असे करताना सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिया मौलवींचा संपर्क क्रमांक मागितला आहे. हे मौलवी जिल्ह्यातील नागरी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार व मोहरम दरम्यान जिल्ह्यात होणाऱ्या उपक्रमांसंदर्भात अधिकाऱ्यांशी समन्वय साधणार.